हरमल / वार्ताहर
अलीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे गोवा हवालदिल झाला असून सरकार प्रमुख “भिवपाची गरज ना’,म्हणून अकार्यक्षमता सिद्ध करीत आहेत. ’भिवपाची गरज ना’ह्या वारंवारच्या निवेदनामुळे नागरिकांची करमणूक होत आहे. मात्र,सध्या हरमलच्या पोलिस आऊट पोस्टच्या कर्मचाऱयांत ’भिवपाची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांना केवळ पायवाटे’साठी पंचायतीस निवेदन देण्याची पाळी आल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
सध्याच्या पायवाटेच्या मार्गात अनेकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून धोकादायक स्थितीतील पायवाट कोणाचा अंत तर पाहत नाही ना,अशी शंका नागरिक व्यक्त करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेल्या सरकारी शाळा इमारतीत, हरमलचे पोलिस आऊट पोस्ट स्थळांतर केल्यास 20 पेक्षा जास्त वर्षे उलटली आहेत.प्रमुख रस्त्यापासून शंभर मीटर आत असलेल्या इमारतीतून आऊट पोस्टचा कारभार चालत आहे.मात्र प्रारंभापासून आऊट पोस्टला रस्ता ही प्रमुख समस्या आवासून उभी होती.गेल्या साधारण 20 वर्षात तीन -चार आमदार,खासदार,मंत्री,मुख्यमंत्री आदी राजकारणी मंडळीने ह्या भागाचे प्रतिनिधित्व केले.त्याच इमारतीत ’पोलिंग बूथ’ सुद्धा कार्यरत होते.राजकारणी मंडळींनी आश्वासने दिल्याचे जनतेच्या स्मरणात आहेत, मात्र त्या आश्वासनांचा राजकारण्यांना विसर पडल्याने, जनतेने त्याना घरी पाठविण्याचे काम केले, असे नागरिक परशुराम हरमलकर यांनी सांगितले.मात्र अद्याप रस्ता नकोच साधी व्यवस्थित पायवाट सुद्धा होऊ शकली नाही ह्याची शोकांतिका असल्याचे हरमलकर यांनी सांगितले.
सध्या पोलिस कर्मचारी व लोकांना आवश्यक पायवाटच ’सुस्थितीत’ नसल्याने पंचायतीला निवेदने देण्याची गरज,आऊट पोस्टचा ताबा सांभाळणारे पोलिस अधिकारी ठाकूर यांनी बोलून दाखविली.तेथील पोलिस कर्मचाऱयांना व संपर्कात येणाऱया नागरिकांना ’भिवपाची गरज निर्माण’ झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात.
सदर आऊट पोस्टबाबत अनेकदा वर्तमानपत्रातून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला,तसेच ग्रामसभातून रस्त्यासाठी नव्हे,तर केवळ पायवाटेच्या मागणीसाठी ठराव घेतले.एकदा तर माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना ग्रामस्थानी निवेदन दिले.मात्र,रस्त्याच्या बाबतीत उलटय़ा दिशेने प्रवास असल्याचे नागरिक हरमलकर यांनी सांगितले.रात्री अपरात्री नागरीकांच्या सुरक्षेसाठी धावाधाव करणाऱया पोलिस योद्धाचा जीव सुरक्षित नसल्याचे ’ती’ पायवाट पाहून समजते,असे मत एका पोलिस कर्मचाऱयांच्या मित्राने प्रस्तुत प्रतिनिधिकडे बोलताना सांगितले.
पावसाचा जोर वाढत असल्याने पडलेले खड्डे व धोकादायक चर,मातीने भरून काढल्यास माती पुन्हा वाहून जाईल त्यामुळे सदरचे काम पावसाळय़ानंतर होऊ शकते,असे मत सरपंच मनीषा नाईक कोरकणकर यांनी सांगितले.
दरम्यान,तत्कालीन सरपंच दीपिका वायंगणकर यांनी पोलिसांच्या मागणीनुसार पायवाटेवर स्वतःच्या खर्चाने वीज खांब नसताना पथदिपाची सोय केली होती.तसेच पंचसदस्य प्रविण वायंगणकर यांनी पायवाटेवरील अनावश्यक झाडाझुडुपे हटविली होती.
…तर गिरकरवाडा इमारत योग्यच —
खालचावाडा भागांतील आऊट पोस्ट अडगळीच्या जागेत असल्याने गिरकरवाडय़ावरील बंद असलेल्या सरकारी प्राथमिक शाळा इमारतीत स्थलांतर करण्याची सूचना नागरिकांनी केली होती, मात्र ’ती’ सूचना लालफितीत अडकल्याने आऊट पोस्ट अखेरची घटका तर मोजीत नाही ना,अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली.सद्यस्थितीत गिरकर वाडा इमारत योग्य असल्याचे नागरिकांचे मत आहे. तरी सरकारने पोलिस आऊट पोस्टच्या कर्मचारी व नागरिकांसाठी व्यवस्थित पायवाट वा रस्ता उपलब्ध करावा अन्यथा त्याचे स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.