– प्रयाग-चिखली,आंबेवाडीसह नदीकाठावरील गावातील लोकांचा सूर
-महापूराचा फटका बसण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर
अहिल्या परकाळे/कोल्हापूर
गतवर्षीच्या महापुराचा नदीकाठच्या गावांसह शहरातील काही प्रभागातील लोकांना मोठा फटका बसला होता. प्रयाग चिखली, आंबेवाडीतील ग्रामस्थांना तर जीव मुठीत घेवून घराच्या दुसऱया मजल्यासह छतावर तीन ते चार दिवस अन्न-पाण्याशिवाय रहावे लागले. ज्याच्यावर संसाराचा गाडा सुरू आहे, अशा कित्येक जनावरांना जड अंतकरणाने महापुराच्या पाण्यात सोडून द्यावे लागले. जिल्हा प्रशासन आणि शहरातील सामाजिक संस्था, तरूण मंडळे यांच्या सहकार्याने पूरग्रस्तांना पुराच्या पाण्यातून काढून सुरक्षित स्थळी पोहचवल्यामुळे जिवितहाणी टळली. यंदा मात्र वेळीच सावध होवून प्रयाग चिखली, आंबेवाडीसह 23 गावे आणि शहरातील नदीकाठचे लोक सुरक्षित स्थळी स्थलांतरीत झाले आहेत. ‘तरूण भारत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता गतवर्षीच्या कटू अनुभवावरून यंदा ‘आम्ही वेळीच सावध झालो’ अशा प्रतिक्रिया दिल्या.
गतवर्षीच्या महापूरामध्ये प्रयाग चिखली, आंबेवाडीसह जिह्यातील अनेक गावे महापुराच्या पाण्याखाली गेली होती. जवळपास पंधरा दिवस कोल्हापूर जिल्हयाशी इतर जिल्हय़ांचा संपर्क तुटला होता. एस. टी. बस, रेल्वे, ट्रकसह इतर वाहतूक करणारे लोक रस्यावर पाणी असल्याने जागीच थांबले होते. कोल्हापूरकरांच्या दातृत्वामुळे आम्ही जिवंत राहिलो, अशा हृदय पिळवटून टाकणाऱया प्रतिक्रिया बाहेरगावांसह परराज्यातून आलेल्या लोकांनी दिल्या होत्या. जवळपास एक महिनाभर जिल्हय़ासह राज्यातील दानशुरांनी निवारा केंद्रातील लोकांना सर्वोत्परी मदत करून जगण्याची नवी उमेद दिली होती. नदीकाठची हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचेही प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱयांचे पशुधनही महापुरात नाहीसे झाले. अंगावरच्या कपडय़ानिशी बाहेर पडलेल्या लोकांच्या हातात फक्त स्वतःचा जीव वाचवण्यापलिकडे काहीच नव्हते. लाखो, करोडोची संपत्ती असणाऱया लोकांसह सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनीही निवारा केंद्राचा आधार घेतला होता. महापुरामध्ये जात, धर्म, पंतांच्या पलीकडे जावून लोक एकमेकांना मदतीचा हात देत होते. त्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराचा वारसा निवारा केंद्रावर पाहावयास मिळाला. जीवनावश्यक वस्तूंसह जवळपास तीन ते चार महिने पुरेल एवढे धान्य दानशुरांनी पूरग्रस्तांना दिले होते. अनेक संघटनांसह लोकांनीही पूरग्रस्तांच्या जेवनाची व्यवस्था केली होती. दोन वेळचा चहा, नाष्टा जेवन यासह लहान मुलांना बिस्कीटेही पुरवण्यात आली होती. त्यामुळे पूरग्रस्तांना जण्यासाठी दिलासा मिळाला होता.
गतवर्षी महापुराचा धोका असल्याने नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने स्थलांतराचे आवाहन केले होते. मात्र कधीच आमच्या घरात पाणी येत नाही, या अविर्भावात ग्रामस्थांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. परिणामी जीव वाचवण्यासाठी अंगावरच्या कपडय़ासह घराबाहेर पडावे लागले. काहींची घरेसुध्दा जमिनदोस्त झाली. यंदा मात्र जिल्हा प्रशासनाने आवाहन करताच प्रयाग चिखलीसह जिल्हय़ातील 23 गावांमधील 1878 कुटुंबातील 5 हजार 561 लोक सुरक्षितस्थळी स्थलांतरीत झाली आहेत. वेळीच सावधानता बाळगल्याने महापुर आला तरी या लोकांचे फारसे नुकसान होणार नाही. म्हणून त्यांच्या चेहऱयावर समाधानाचे वातावरण आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने घेतलेली खबरदारीचे पूरग्रस्तांकडून स्वागत होत आहे.
पहिल्यांदा गाव रिकामे
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाच्या धास्तीने संपूर्ण गाव सोनतळीसह अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत झाले आहे. महापुराच्या भितीपोटी पहिल्यांदाच गाव रिकामे झाल्याचे पाहावयास मिळाले. जिल्हा प्रशासनानेही सोनतळी येथील निवारागृहात जेवनाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पावसाळा संपेपर्यंत गावाकडे येण्याची घाई करू नये. –डॉ. शिवाजी पवार (प्रयाग चिखली)
गावात स्मशान शांतता
गतवर्षी आलेल्या महापुरामुळे जीव मुठीत घेवून लोक सैरावैरा धावत होती. जिल्हा प्रशासन, सामाजिक संघटनांच्या मतदीमुळे गावकऱयांचे प्राण वाचले. गतवर्षीच्या अनुभवातून सरकारने सोनतळी येथे दिलेल्या जागेवर 80 टक्के लोकांनी घरे बांधली. त्यामुळे यंदा मात्र प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे जनावरांसह लोकांनी स्थलांतर केल्याने गावात स्मशान शांताता आहे. उर्वरीत 10 टक्के लोकांना प्रशासनाने निवारा केंद्रात ठेवले आहे. सरकारने सोनतळीची जागा प्रत्येकाच्या नावावर करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली आहे. – प्रभाकर पाटील (प्रयाग चिखली विकास सेवा संस्था संचालक)