खोची/प्रतिनिधी
प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची कोणतीही हालचाल होत नसल्याने खोची ता.हातकणंगले येथील पूरग्रस्तांनी गायरानात स्वतः तात्पुरते निवारे शेड उभी केली आहेत. पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने यंदाच्या महापुराच्या भीतीने पूरग्रस्त नागरिकांनी प्रशासनाची वाट न पाहता तात्पुरती राहण्याची व जनावरांची सोय केली आहे. शासनाच्या दिरंगाईमुळे पुनर्वसन न झाल्याने पूरग्रस्तांची ससेहोलपट होत आहे.
गेल्यावर्षी वारणा नदीला आलेल्या महापूराने येथील चारशे अठ्ठावीस कुटुंबांना स्थलांतर व्हावे लागले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने लगेचच या पूरग्रस्त कुटुंबांचे शासकीय गायरान जमिनीत पुनर्वसन करण्याची घोषणा केली होती. परंतु वर्ष झाले फक्त गायरानातील जागेची मोजणी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. प्रत्यक्ष पुनर्वसन करण्याची शासनाने कार्यवाही केली नसल्याने पूरग्रस्त कुटुंबांंनी स्वतः हून गायरान जागेत तात्पुरती निवारा शेड उभी केली आहेत.काही पूरग्रस्तांनी आजपर्यंत पडक्या घरातच राहून, पुनर्वसन होणार या आशेने वास्तव्य केले. यावर्षीही पुन्हा एकदा वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले होते. गावाजवळ पूराचे पाणी आल्याने या नागरिकांनी महापूराच्या भीतीने स्थलांतर करीत गायरान जमिनीत तात्पुरती निवारे शेड उभी केली आहेत.जनावरांना व स्वतः राहण्यासाठी जागेची आखणी करून पत्र्याचे शेड उभा केले आहेत.
गेल्या वर्षी महापूराचे पाणी घरात शिरल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले होते. पुनर्वसन होणार या आशेने घराची डागडुजी करून वर्षभर वास्तव्य करीत आहे; परंतु शासनाने पुनर्वसनबाबत कोणतीच प्रक्रिया केली नसल्याने गायरान जागेत शासनाच्या नियमानुसार जागा आखून ठेवली आहे. या जागेत तात्पुरती राहण्याची सोय करणार आहे. सुर्यकांत बाबर, पूरग्रस्त
सध्या ग्रामपंचायतीवर शासकीय प्रशासकाचे काम सुरु आहे. तरीही पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकाल संपला तरी पाठपुरावा करणार आहे. शासकीय जमिनीत एकूण ७२ एकर भुखंड आहे.प्राधान्याने पूरग्रस्तांना भूखंड देऊन उरलेले भूखंड गावकऱ्यांना द्यावे यासाठी प्रयत्न करणार आहे.४८ एकरात सर्वांना भूखंड देऊन उर्वरित जागेत इतर सुविधा देता येतील. अमरसिंह पाटील, माजी उपसरपंच, खोची