नगर परिषदेकडून स्वच्छतामोहीम, जनजीवन पूर्वपदावर, भीती कायम
प्रतिनिधी/ चिपळूण
गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या धुवाँधार पावसामुळे रविवारी शहरात आलेला पूर ओसरला आहे. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीती कायम आहे. पुरामुळे शहरात साचलेला कचरा नगर परिषद कर्मचाऱयांनी तत्काळ उचलून शहर चकाचक केले. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी दिवसभर अधूनमधून मोठय़ा सरी कोसळत होत्या. रात्री 10.45 वाजल्यापासून वाशिष्ठी व शिवनदीच्या पातळीत मोठी वाढ झाली. रविवारी शहरातील खाटीक गल्ली, बाजारपूल परिसर, रंगोबा साबळे रोड, चिंचनाका, भोगाळे, मध्यवर्ती बसस्थानक, वडनाका, अनंत आईस फॅक्टरी, वेस मारुती मंदिर परिसर जलमय झाला. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने सायंकाळी पूर कमी झाला. पुराच्या पाण्यामुळे शहरात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात कचरा साठला होता. मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते यांनी सफाई कर्मचाऱयांची पथके तयार करून काही तासांतच शहर चकाचक केले.
पूर ओसरताच अर्धी बाजारपेठ सुरू करण्यात आली. नागरिकही खरेदीसाठी बाजारात येत होते. ज्या भागात कायम विनापरवानगी मच्छी विक्री होते त्या भागात पुराचे पाणी असल्याने व्यावसायिकांनी गुहागर नाक्यासह अन्य पाणी नसलेल्या ठिकाणी आपला व्यवसाय थाटला होता. मच्छीची घाण व पाणी रस्त्यावरच टाकल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. याची माहिती मुख्याधिकारी डॉ. विधाते यांना मिळाल्यावर त्यांनी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पाठवून विक्रेत्यांना तेथून हटवले व घाणही उचलण्यास लावली.
रविवारपासून मुसळधार पाऊस सुरूच असल्याने वाशिष्ठी व शिवनदी दुथडी वाहत आहे. पूर ओसरला असला तरी पुराचा धोका व भीतीही कायम आहे. रविवार ते सोमवारी सकाळपर्यंत येथे 84.64 मि. मी., तर आतापर्यंत 3414 मि. मी. पाऊस पडला आहे.