ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील आझमगड येथील बांसा गाव हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेले महाराष्ट्र राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना गुरुवारी आझमगड पोलिसांनी ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलिसांनी आझमगडच्या सीमेवर नितीन राऊत यांची गाडी अडवली. राऊत यांनी आपल्याला आझमगडमध्ये प्रवेश करुन द्यावा, असे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी यासाठी परवानगी नसल्याचे सांगत नितीन राऊत यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाली होती. वाराणसीच्या दौऱ्यावर असलेले नितीन राऊत आज बांसा येथे जाऊन सरपंचाच्या कुटुंबीयांची भेट घेणार होते. मात्र, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगत पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला.
यानंतर नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी ठिय्या मांडला आहे. नितीन राऊत म्हणाले, बांसा गावात जाऊन सरपंचाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही.