ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात आता केवळ रविवारी पूर्ण लॉकडाऊन सुरू असणार आहे. शनिवारचे लॉकडाऊन पूर्णपणे बंद करण्यात आले असून आता बाजारपेठा देखील सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती योगी सरकारकडून देण्यात आली. यापूर्वी शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन सुरू होते. विकास योजनेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे आदेश या आठवड्यापासूनच लागू केले जातील.
अनलॉक व्यवस्थेची समिक्षा करताना मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, प्रदेशात ज्या विकास योजना सुरू आहेत त्यांना गती दिली जाणार आहे. त्यासाठी कृषी उत्पादन आयुक्त, औद्योगिक विकास आयुक्त, अप्पर मुख्य सचिव, प्रमुख सचिव आणि विभागाध्यक्षांनी आपल्या क्षेत्रातील कार्यालयांचे निरीक्षण करावे.
मुख्यमंत्र्यांनी सर्व मंडल आयुक्तांना आदेश दिले की, 50 कोटी पेक्षा अधिक असलेल्या विकास योजनांची समिक्षा करावी. स्कूल, कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद राहतील मात्र, 21 सप्टेंबरपासून 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 21 सप्टेंबरपासून लग्न समारंभ, अन्य धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.