कोची / वृत्तसंस्था
मूलभूत हक्कांवर आवाज उठविणारे केरळमधील प्रसिद्ध संत आणि घटनेची मूलभूत रचना अबाधित राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते संत केशवानंद भारती यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. निधनसमयी ते 79 वर्षांचे होते. ते केरळमधील कासागोड जिल्हय़ातील रहिवासी होते. तेथे बांधलेल्या आश्रमात त्यांचा मृत्यू झाला. भारती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
पूज्य केशवानंद भारती हे देशाचे एक महान संत आणि समाजसुधारक होते. संविधानाच्या मूल्यांच्या प्रगतीसाठी आणि देशाची संस्कृती वाढविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
केरळमधील भूमिहीन शेतकऱयांना जमीन वाटप करण्यासाठी राज्य सरकारने आणलेल्या भूसंपादन कायद्याला आव्हान देण्यासाठी केशवानंद भारती यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेमध्ये दुसऱया घटना दुरूस्तीनुसार केरळ जमीन सुधार अधिनियम 1963 मध्ये घटनेच्या नवव्या परिशिष्टात समाविष्ट करण्याचे आव्हान देण्यात आले होते. केशवानंद यांनी या कायद्यावर मूलभूत अधिकाराचे उल्लंघन असल्याचे सांगून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 13 सदस्यीय घटनापीठ स्थापन केले होते. या पीठासनसमोर 68 दिवस खटला चालला होता. या सुनावणीदरम्यान ‘इन्फ्रास्ट्रक्चर प्रिन्सिपल’ निश्चित करण्यात आले होते. केशवानंद भारती यांच्या वतीने सुप्रसिद्ध वकील नानी पालकीवाला यांनी युक्तिवाद केला होता. या प्रसिद्ध खटल्यात 24 एप्रिल 1973 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 7:6 च्या बहुमताच्या आधारे निकाल दिला होता. या खटल्यामुळे केशवानंद यांचे नाव देशभर बरेच चर्चेमध्ये आले होते.