ऑनलाईन टीम / इटानगर :
अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या 5 तरुणांचे चिनी लष्कराने अपहरण केल्याचे उघड झाले आहे. या तरुणांना चीन लवकरच भारताच्या हवाली करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली आहे.
तनू बाकार, प्रसाद रिंगलिंग, न्गारू दिरी, डोंगटू ईबिया, तोच सिंगकाम अशी अपहरण झालेल्या नागरिकांची नावे आहेत. हे पाचही लोक तागिन समुदायाशी संबंधित आहेत. हे लोक जंगलात शिकार करण्यासाठी गेले असताना त्यांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले.
बेपत्ता तरुणांबाबत भारताने चीनकडे विचारणा केली होती. त्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कराच्या संदेशाला हॉटलाइनवर प्रतिसाद देऊन हे पाच तरुण त्यांच्या भागात आल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. लवकरच चीन या तरुणांना भारताच्या हवाली करणार आहे.