प्रतिनिधी/ रत्नागिरी
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जैतापुर अणुउर्जा प्रकल्पाने पुन्हा वेग घेतला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळ मिळवण्यासाठी केंद्रसरकारने प्रशिक्षण योजना हाती घेतली आहे. त्यासाठी व्हिजेटीआय, ईडीएफ, आय2ईएन यांच्यात सांमजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 25 हजार जणांना थेट रोजगार मिळेल असा दावा करण्यात आला असून 7 कोटी घरांमध्ये वीज पुरवण्याचे प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे.
राजापूर तालुक्यातील 14 गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प राजकिय धोरणाचा भाग म्हणून स्थगित करण्यात आला. या प्रकल्पावरून विरोध व समर्थन असे संमिश्र वातावरण सुरू आहे. या प्रकल्पाच्या अगोदर जैतापुर परिसरात अणुउर्जा प्रकल्प सुरु करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. फ्रान्स बरोबरची चर्चा लांबल्याने बरीच वर्षे हा प्रकल्प खोळंबला. रत्नागिरी रिफायनरी स्थगित झाला आणि जैतापुर प्रकल्प खोळंबल्यामुळे आधीच मागास असलेल्या राजापुर तालुक्याचा विकास लांबणीवर पडणार का असा प्रश्न निर्माण झाला असतानाच पुन्हा एकदा जैपापुर प्रकल्पासाठी गतीमान पावले पडू लागली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशाची व जगाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यातून मार्ग काढण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. दृष्टीपथात असलेल्या जैतापुर प्रकल्पाला पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून आता प्रकल्प संस्था व तांत्रिक संस्था यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष मार्गी लागेपर्यंत तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करण्याची योजना केंद्र सरकारने हाती घेतली आहे.
सेटर फॉर एक्सलन्सची स्थापना
महाराष्ट्रात सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवहार्यतापूर्व अभ्यासासाठी ईडीएफ, आय2ईएन आणि व्हीजेटीआय या संस्थांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱया केल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थात्मक, औद्योगिक व शिक्षण/संशोधनात्मक पातळीवरील नागरी अणु क्षेत्रातील भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याचे बळकटीकरण करणे, औद्योगिक क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचा विस्तार, सुरक्षिततेबाबतच्या अत्युच्च मानकांचे अवलंबन आणि अतिप्रगत प्रशिक्षण दृष्टिकोन यांना चालना देणे हे या तीन संस्थांचे उद्दिष्ट आहे.
प्रकल्पाशी संबधीत कामांसाठी प्रशिक्षण
जैतापूर प्रकल्पाची संरचना, प्रोक्युरमेंट, बांधकाम, कार्यान्वयन आणि परिचालनाशी निगडित सर्व कामांच्या संदर्भात आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणे हे या सेंटर ऑफ एक्सलन्सचे लक्ष्य असणार आहे. शिक्षण/संशोधन क्षेत्रातील, तसेच औद्योगिक क्षेत्रातील भागधारकांचा या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सहभाग असेल, ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणारे विशेष अभ्यासक्रम आणि मोडय़ूल्स हे प्रकल्पाशी संबंधित विविध निश्चित गरजा आणि प्रत्यक्ष कामकाजातील आवश्यकतांसंदर्भातील सर्व उत्तरे देण्यास सक्षम असतील, याची खातरजमा केली जाईल. ज्ञानी अध्यापक, संशोधक आणि औद्योगिक तज्ञांच्या माध्यमातून भारतातील या ईपीआर प्रकल्पाच्या विकासात सहभागी असलेल्या भारतीय कंपन्यांमधील अभियंते व तंत्रज्ञ, तसेच पुरवठादारांना हे सेंटर ऑफ एक्सलन्स प्रशिक्षण देईल.
कार्बनमुक्त वीज निर्मिती
जैतापूर प्रकल्प हा भारत व फ्रान्स यांच्या भागिदारीतील धोरणात्मक प्रकल्प आहे. 2 ईपीआर युनिट्सच्या बांधकाम कालावधीत भारतात 25 हजार थेट रोजगारांसह अतिउच्च कौशल्याधारित रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. 2035 पर्यंत प्रतिवर्षी 75 टेरावॉट प्रति तासापर्यंत कार्बनमुक्त वीज निर्मितीची क्षमता आहे. या प्रकल्पातून 7 कोटी घरांना पुरेल इतकी वीज पुरवली जाणार असून प्रतिवर्षी 8 कोटी टन कार्बन उत्सर्जनाला आळा बसणार आहे.
कौशल्य विकासाचे सामायिक व्यासपीठ
व्हीजेटीआयचे संचालक प्रो. धीरेन पटेल म्हणाले “ईपीआर तंत्रज्ञानाशी निगडित वैशिष्टय़पूर्ण कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स सामायिक व्यासपीठ म्हणून काम करेल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची यशस्वी अमलबजावणी व परिचालनासाठी आवश्यक असलेले शाश्वत प्रशिक्षण आणि संशोधन परिसंस्थेच्या उभारणीसाठी, तसेच “आत्मनिर्भर’’ मोहिमेअंतर्गत भविष्यातील प्रकल्पांसाठी सुरक्षिततेवर विशेष भर दिला जाईल. देशातील अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया रचणाऱया संस्थांपैकी एक असलेले व्हीजेटीआय क्षमता निर्मितीमधील प्रदीर्घ व समृद्ध अनुभवाचा चांगला वापर करू शकेल.’’
अणुप्रकल्पासाठी प्रशिक्षण अत्यावश्यक
आय2ईएनचे संचालक डॉ. हेन्री साफा म्हणाले “यशस्वी अणुप्रकल्पासाठी प्रशिक्षण हा अत्यंत कळीचा घटक आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात, संबंधित कंपनीत, तसेच भारतीय पुरवठा साखळीत रोजगार निर्मिती होऊन स्थानिक पातळीवर आर्थिक विकासाला गती मिळते. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आय2ईएन आपले योगदान देईल. व्हीजेटीआय आणि अन्य भारतीय अणु भागधारकांसमवेत यशस्वीरित्या एकत्र काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’
‘स्कील इंडिया’त योगदान
ईडीएफ समूहातील नव्या अणु प्रकल्प विकास विभागाचे प्रमुख वरिष्ठ उपाध्यक्ष वाकिस रमाणी म्हणाले, “स्किल्स इंडिया राष्ट्रीय कार्यक्रमाला साथ देण्यासाठी ईडीएफ कटिबद्ध आहे. जैतापूर येथील सहा ईपीआरचा प्रकल्प आणि एकूणच भारतीय अणुउद्योग क्षेत्राला पाठबळ देण्याच्या संदर्भात मनुष्यबळ क्षमता विकास आणि कौशल्य विकासात गुंतवणुकीला आमचे प्राधान्य आहे. व्हीजेटीआय आणि आय2ईएन यांसारख्या दोन प्रतिष्ठित संस्थांशी भागिदारी करताना आणि अभियांत्रिकी व शिक्षण/संशोधन क्षेत्रात भारत-फ्रान्स संबंध अधिक सुदृढ करण्यात योगदान देताना आम्हाला अभिमान वाटत आहे. भारतात ईपीआर तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची वृद्धी होण्यासाठी, तसेच नजीकच्या भविष्यात भारतीय तंत्रज्ञ आणि अभियंत्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी योगदान देण्यात हे सेंटर ऑफ एक्सलन्स उपयुक्त ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.’’