जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांचा अधिकाऱयांना सवाल
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे जनता अक्षरशः त्रस्त झाली आहे. वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार जो निधी देत आहे तो निधी कोठे जात आहे? असा खडा सवाल जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी जिल्हा पंचायतीच्या बैठकीमध्ये केला.
सिव्हिल हॉस्पिटल तसेच इतर हॉस्पिटलमध्ये उपचार मिळणे कठीण बनले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक राज्याला मदत करत आहे. तसेच राज्य सरकारही प्रत्येक जिह्याला मदत करत आहे. मात्र ही होणारी मदत कोठे जात आहे? त्याबाबत या बैठकीत अधिकाऱयांनी माहिती द्यावी, अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार मिळणे कठीण झाल्यामुळे खासगी हॉस्पिटलना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली. कोरोना रुग्ण दाखल झाल्यानंतर त्या रुग्णालयाला दीड लाख रुपये दिले जात आहेत. त्यामुळे अनेक खासगी हॉस्पिटल बोगस नावे देखील दाखवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खासगी हॉस्पिटल्सना हा निधी देण्यापेक्षा सिव्हिल हॉस्पिटलमध्येच आणखी काही विभाग सुरु करावेत, याचबरोबर ऑक्सीजनही उपलब्ध करावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
जिल्हा पंचायतमध्ये होणाऱया बैठकींच्या वेळेत बदल करणे महत्वाचे आहे. जिह्यातून विविध भागांतून लांबहून सदस्य बैठकीसाठी येतात. मात्र बैठक केवळ एक तासाभरात गुंडाळली जात आहे. दुपारी 3 वाजता बैठकीचा वेळ दिला जातो. त्यावेळेत बदल करुन 11 वाजता बैठक घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. खासगी रुग्णालयामध्ये मोठय़ा प्रमाणात कोरोना रुग्णांच्या कुटुंबियांकडून पैसे उकळले जात आहेत. तेंव्हा सरकारने गोरगरीब रुग्णांना उपचार मिळावेत असे सरस्वती पाटील यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही कोविड विभाग सुरु करावे. त्या ठिकाणीही ऑक्सीजनची उपलब्धता करावी. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील ताण कमी होईल. तसेच सर्वसामान्य जनतेला वेळेत उपचार मिळाले तर त्यांचा प्राण वाचेल यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. त्या दृष्टिने तातडीने अधिकाऱयांनी आरोग्य विभागाला सूचना करावी, अशी मागणी देखील जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी केली आहे.