प्रतिनिधी/बेळगाव
प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे. सीमाभागामध्ये 25 लाख मराठी भाषिक आहेत. त्यामुळे साहजिकच ते आपल्या मातृभाषेच्या जतनासाठी प्रयत्न करत असतात. समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी, साहित्याची देवाणघेवाण करण्यासाठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात येते. असे असताना पोटशूळ उठलेल्या कर्नाटक सरकारबरोबरच पोलीस नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. कुदेमनी येथील साहित्य संमेलनाच्या आयोजकांना पुन्हा नोटीस बजावण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या आयोजकांनी मंगळवारी पोलीस आयुक्तांना निवेदन देवुन चालेल्या अन्यायाबाबत माहिती दिली.
आम्हाला जर अशा प्रकारे तुम्ही नाहक त्रास देत असाल तर यापुढे प्रत्येक गावामध्ये साहित्य संमेलन भरवू, लोकशाहीने प्रत्येकाला आपल्या हक्कांचा अधिक दिला आहे. असे असताना आमच्या हक्कांवर गदा आणणे हे बेकायदेशीर आहे. तेंव्हा याचा वेळीच विचार करावा आणि अशा प्रकारे पाठविण्यात आलेल्या नोटीसी मागे घ्याव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे.
मराठी भाषिकांवर नेहमीच दडपशाही करणाऱया कर्नाटक पोलिसांनी पुन्हा कुदेमनी मराठी साहित्य संमेलन आयोजकांना नोटीस पाठविल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. काकती पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता या बेकायदेशीर नोटिसी विरोधात जिल्हासत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. साहित्य संमेलनचे आयोजन केल्यामुळे भाषिक तेढ निर्माण होतो असा जावई शोध कर्नाटक पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने काढला आहे. या मराठी साहित्य संमेलनाविरोधात नोटीसा पाठवून त्यांच्यावर दडपशाही केली जात आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काकती पोलिसांच्या विरोधातच याचिका दाखल केली आहे. पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, ऍड. महेश बिर्जे, कुदेमनी साहित्य संमेलन संयोजक नागेश निंगाप्पा राजगोळकर, मोहन केशव शिंदे, शिवाजी महादेव गुरव, काशिनाथ गुरव, मारुती गुरव, गणपती बडसकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.