प्रतिनिधी / जयसिंगपूर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव टोलनाक्याजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे पाऊण तास रस्तारोको केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी समाज बांधवांच्यावतीने तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान प्रशासनाला असहकार्य करण्याचे जयसिंगपूर शहरातून सुरुवात करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच….अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही… छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय जिजाऊ जय शिवराय… एक मराठा लाख मराठा…. अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्यामुळे परिसर दुमदुमून गेला होता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी शासनाला समाजाच्या भावना समजाव्यात याकरिता रास्ता रोको चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना नगरसेवक सर्जेराव पवार म्हणाले शासनाने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती देत प्रकरण घटना पीठाकडे वर्ग केले आहे. यामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजाला आरक्षण मिळेतोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शासनाला असहकार्य समाज करणार आहे. त्याची सुरवात जयसिंगपुरातून करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेचा कोणताही कर न भरण्याचे आवहन पवार यांनी यावेळी केली.
जि. प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले समाजाला आरक्षण मिळाले नाही यामुळे आपण आपल्या जि. प. सदस्यपदाचा राजीनामा समाज बांधवांकडे सुपुर्द करीत आहोत. याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार समाज बांधवांना तर राहतील. नगराध्यक्षा डॉ. नीता माने म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. आरक्षण नसल्याने समाजातील तरुणांची फरफट होत आहे. यावेळी कुरूंदवाड ते नगरसेवक वैभव उगळे यांचे भाषण झाले. यावेळी शिरोळच्या तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ, पोलिस उपधिक्षक किशोर काळे यांना समाजबांधवांनी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी लोकप्रतिनीधींनी आपले राजीनामे देण्याची घोषणा केली.
याप्रसंगी जि. प. सदस्य डॉ. अशोकराव माने, नगरसेवक बजरंग खामकर, रंगराव पवार अभिजीत भांदिगरे, संजय चव्हाण, अजित पवार, सागर मादनाईक, शंकर नाळे, सुनील ताडे, भगवंत जांभळे, गुलाब शेख, रणजीत महाडिक, प्रणव पवार, राहुल पाटील, तेजस कुराडे, नयन पवार, सुधीर खाडे, शंभूराज पवार, तानाजी जाधव, संताजी जाधव, गणेश तावडे, सचिन मिसाळ, अमर पाटील, दिलीप माने, धनराज पवार, रणजित घोरपडे, अक्षय बाबर, बजरंग पवार यांच्यासह समाजबांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता.