खेड पोलिसांची हर्णेवर करडी नजर, तीन पोलीस पथकांचा मुंबईतील तळही कायम
प्रतिनिधी/ खेड
दोन किलो सोने खरेदीच्या व्यवहारातील सोने न देताच चौघांना चाकूचा धाक दाखवत 60 लाखाची रोकड लुटणाऱया टोळीचा मुख्य सूत्रधार किशोर पवारसह अन्य चार फरारींचा अजूनही पोलिसांना सुगावाच लागलेला नाही. फरारींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. फरारींच्या शोधार्थ तीन पोलीस पथकांचा मुंबईतील तळ अजूनही कायमच असून स्थानिक पोलिसांनी मुख्य सूत्रधाराचे गाव असलेल्या हर्णेवर करडी नजर ठेवली आहे.
दोन किलो सोने कमी किंमतीत देण्याच्या आमिषाने 12 जणांच्या टोळीने चौघांना चाकूचा धाक दाखवत 60 लाखाची रोकड लुटली. या टोळीतील विक्रम वसंत चव्हाण (दस्तुरी), सिद्धेश विठ्ठल पवार (सुकिवली) या दोघांच्या येथील पोलिसांनी काही तासांतच मुसक्या आवळल्या होत्या. या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टोळीतील अन्य फरारींच्या शोधार्थ येथील पोलिसांची 3 पथके रातोरात मुंबईला रवाना झाली होती. मुख्य सूत्रधार किशोर पवार दापोली तालुक्यातील हर्णे येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांची झाडाझडती घेतली. मात्र मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला नाही. तीन पोलीस पथके फरारींच्या शोधार्थ जंगजंग पछाडत होते. एका पथकाने पाचजणांना रायगड जिल्हय़ातील म्हसळा येथील जंगलमय भागातून तर एकास मंडणगड येथून गजाआड करण्यात आले. नरेश वसंत चव्हाण, विजय गौरीशंकर भगत, प्रमोद उर्फ बबल्या रामचंद्र चव्हाण, दीपक माणी चव्हाण, अंकुश पंढरीनाथ पवार (सर्व म्हसळा), मनोज रमेश जाधव (मंडणगड) या सहाजणांच्या टोळीकडून 2 लाखाच्या रोकडसह 1 अल्टो कार, 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
टोळीतील सहाजणांना जेरबंद केल्यानंतर मुख्य सूत्रधारासह अन्य चार फरारींच्याही लवकरच मुसक्या आवळू, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र 10 दिवसांचा कालावधी लोटूनही मुख्य सूत्रधारासह अन्य चार फरारींना पकडण्यास पोलीस यंत्रणेस अपयश आले आहे. लुटीतील 58 लाखाची रोकड मुख्य सूत्रधाराकडेच आहे. मुख्य सूत्रधार किशोर पवार हा अटकेतील 6 जणांसमवेत पनवेलपर्यंत होता. त्यानंतर तो कुठे गेला, या बाबत काहीच माहिती नसल्याचे 6 जणांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार मुंबईत तळ ठोकलेल्या पोलीस पथकांनी पनवेलपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत मुख्य सूत्रधारासह फरारींचा शोध जारी ठेवला आहे. तीन पोलीस पथकांसह स्थानिक गुन्हा अन्वेषणच पथकही मुंबईतच ठाण मांडून आहेत. मुख्य सूत्रधारासह फरारींना लवकरच गजाआड करण्यात यश येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.