ऑनलाईन टीम / अमरावती :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्वच शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतर शाळा सुरु करता येतील असे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. सध्या याची चाचपणी सध्या सुरु आहे. मात्र, जर दिवाळीनंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला तर शाळा सुरु करणं शक्य नाही, असे मत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
कोरोनाची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालय सुरु करु नका, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यावर अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, जर दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली, संक्रमण कमी न होता वाढले तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंद ठेवाव्या लागतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.