कॉलेजच्या चौथ्या वषी अर्थशास्त्र या विषयासाठी मी शिकवणी लावली होती. त्या वर्गात फी भरायला गेलो तेव्हा आमची ओळख झाली. ती तेव्हा एम. ए. च्या शेवटच्या वर्षात होती. आमची शिक्षिका असणार होती. आम्ही जवळ राहतो आणि एकाच बसने क्लासला जाणार आहोत हे तेव्हा समजलं.
शिकवणीचे वर्ग फक्त शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी असत. वर्गात पंधरा सोळा मुलं होती. सगळी डेक्कनवरची. ती आणि मी बसने जायचो. रविवारी घरी येताना ती मंडईजवळ उतरून भाजी खरेदी करायला जाई. आमचा क्लास सुरू झाला. जून महिन्याच्या शेवटी मी तिला अहोजाहो सोडून एकेरी नावाने संबोधायला सुरुवात केली. लग्नासाठी बचत करायची म्हणून ती स्वतःचा अभ्यास संभाळून इथे नोकरी करीत होती. आर्थिक स्तर समान असल्यामुळे बरोबरीच्या पातळीवरून आमची मैत्री झाली आणि ती घट्ट झाली. एकमेकांना घरातल्या समस्या मोकळेपणाने सांगण्याइतकी घट्ट झाली.
जुलै महिन्यातली गोष्ट. माझे काही तास बुडाले. तेव्हा मी तिच्याकडून नोट्स घेतल्या. तेव्हा तिने न सांगितलेल्या एका गोष्टीची सावली दिसली. एका वहीच्या मागच्या पानावर तिने खास स्त्रीसुलभ वेलबुट्टी काढली होती. वेलबुट्टीमध्ये बेमालूमपणे कोणा मुलाचं नाव लपवलं होतं. पण मी ते शोधून काढलं. शशी कपूर-नंदाच्या एका सिनेमातल्या गाण्यामधील ओळी लिहिल्या होत्या.
मुझपे लोगों ने किए हैं जो सितम, मैं बडी मुश्किल से भूली हूं सनम
पुढच्या एका भेटीत मी फक्त तिला टोचलं तर भळाभळा जसं रक्त वाहू लागेल तसं तिनं तिचं गुपित सांगितलं. तिच्या घरातल्या त्रासापासून तो तिची मुक्तता करणार होता.
पण सत्तरच्या दशकातल्या त्या दिवसात प्रेम वगैरे काय ती प्रकरणं रुपेरी पडद्यावरच सफल व्हायची. एम. ए. पूर्ण व्हायच्या आधीच तिच्या घरातल्यांनी वेगळय़ा मुलाशी तिचं लग्न ठरवलं आणि उरकून टाकलं. तिच्या नोट्सच्या वह्या, नीरजच्या कवितांचं पुस्तक, डायऱया रद्दीत गेल्या असतील किंवा फाडून टाकल्या असतील. सगळा त्रागा आवंढय़ासारखा गिळून तिने निमूटपणे संसार केला. नवऱयाला त्या मुलाचं नाव कळू दिलं नाही. आता ती नाही. तिच्या वहीचं मागचं पान नाही. फक्त माझ्या मनात त्याचं चित्र आहे.