जाहीरनाम्यात आश्वासन : काँग्रेससह अन्य विरोधी पक्षनेत्यांचा भाजपवर जोरदार प्रहार
पटना / वृत्तसंस्था
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुरुवारी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यंदा भाजपने इतर अनेक आश्वासनांपैकी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन आपल्या जाहीरमान्यात दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
भाजपने 11 संकल्प असणारा जाहीरनामा बिहार निवडणुकीसाठी प्रसिद्ध केला आहे. अगदी कोरोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्यांचा यामध्ये समावेश आहे. ‘आयसीएमआर’ने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस मोफत दिली जाईल, असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
जाहीरनाम्यात युवा वर्ग केंद्रस्थानी
कोरानाची लस निःशुल्क देण्याबरोबरच वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण हिंदी भाषेत देण्याचे सुतोवाच करून भाजपने युवावर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शिक्षित बेरोजगारांना संधी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने 3 लाख शिक्षकांची भरती करण्याचे आणि बिहारला आयटी हब बनवून 5 लाख रोजगार देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱया उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही भाजपने जाहीरनाम्यातून दिले आहे.
2022 पर्यंत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात 30 लाख पक्की घरे बांधणार, एक कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार, धान्य आणि गव्हाबरोबरच आता डाळीही विकत घेणार, दुग्ध उत्पादनासंदर्भातील 15 नवे उद्योग सुरू करणार अशी आश्वासनेही भाजपकडून देण्यात आली आहेत.
राहुल गांधींसह विरोधी पक्षांची टीका
बिहारी जनतेला मोफत कोरोना लस देण्याच्या भाजपच्या आश्वासनावर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रोखठोक टीका केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत “कोरोनाची लस मोफत मिळविण्यासाठी लोकांनी आपल्या भागातील निवडणुकीची तारीख पाहावी’’ असा टोमणा मारला आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी ‘कोरोनाची लस भाजपची नव्हे तर संपूर्ण देशाची आहे’ असे म्हटले आहे. इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आपल्या राज्यांसाठी अशी घोषणा का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, बिहारमधील प्रत्येक नागरिकाला येथील राजकीय परिस्थितीचा योग्य अंदाज आहे. त्यांना पक्षाने दिलेल्या आश्वासनांबद्दल योग्य माहिती आहे. आमच्या जाहीरनाम्यासंदर्भात कोणी प्रश्न विचारल्यास आम्ही त्याला नक्कीच योग्य उत्तर देऊ शकतो, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.