ऑनलाईन टीम / पॅरिस :
दहशतवादी संघटनांना अर्थसाह्य आणि गैरव्यवहार रोखण्यास पाकिस्तानला अपयश आल्याने आर्थिक कृती कार्य दल (फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स) संघटनेने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी एफएटीएफने पाकिस्तानला दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर 27 मुद्द्यांवर काम करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी पाकला निर्धारित वेळही दिला होता. पाकला 27 कलमी कृती योजनेवर कार्यवाही करण्यात अपयश आल्याने एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवले आहे.
इम्रान खान सरकारने ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी कॅपीटॉल हिल या अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीची मदत घेतली होती. मात्र, पाकच्या दहशतवादी धोरणाची झळ बसलेल्या भारताने शुक्रवारच्या बैठकीच्या प्रारंभीच या घडामोडींना दिशा दिली. दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान सुरक्षित आश्रयाचे ठिकाण असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले.
लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद अशा संघटना पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत. पाकिस्तान त्यांना अद्याप रोखू शकला नाही. जैश ए मोहम्मदचा संस्थापक आणि संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला दहशतवादी मसूद अजहर तसेच 2008 च्या मुंबई हल्ल्यातील प्रोजेक्ट मॅनेजर साजिद मिर यासारख्या दहशतवाद्यांवर पाक सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान, काही काळातच पाकचा काळ्या यादीत समावेश होऊ शकतो.