शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांची माहिती
प्रतिनिधी / मालवण:
जिह्याच्या सागरी हद्दीत 12 ते 14 वावात मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्सनी अक्षरश: धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ऐन हंगामात मत्स्यव्यवसाय विभागाची गस्तीनौकाच नसल्याने परप्रांतीयांकडून बेसुमार मासळीची लूट होत आहे. त्यामुळे मच्छीमारांमधून संताप व्यक्त होत आहे. शासनाकडे पैसे नसल्यास नुकसान भरपाईपोटी उपलब्ध झालेल्या निधीतून गस्तीनौका घ्यावी आणि मासेमारीची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी केली आहे.
दरम्यान, परप्रांतीयांच्या घुसखोरीबाबत त्यांनी माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांचेही लक्ष वेधले आहे. यावर्षीच्या मासेमारी हंगाम उशिराने सुरू झाला. वादळी वारे, समुद्रांतर्गत बदलामुळे मासेमारीवर परिणाम झाला. आता मासेमारीस पोषक वातावरण असल्याने पुन्हा जोमाने मासेमारीस सुरुवात झाल्याचे जिह्याच्या किनारपट्टी भागात दिसून येत आहे. परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी रोखण्यासाठी शासनाने कडक कायदा केला खरा. मात्र, त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. मासेमारी हंगाम सुरू झाला तरी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेचा अद्याप पत्ताच नाही. याच संधीचा फायदा उठवीत परप्रांतीय ट्रॉलर्सनी जिह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासळीची लूट करण्यास सुरुवात केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने गस्तीनौका उपलब्ध न करता परप्रातियांना आंदण दिले असल्याचा आरोप जोगी यांनी केला आहे. सध्याचा मासेमारीचा हंगाम हा मच्छीमारांसाठी सुगीचा काळ असतो. मात्र, याच काळात जर परप्रातियांकडून घुसखोरी करून मासळीची लूट होत असेल तर मच्छीमारांना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. गस्तीनौकेसाठी शासनाकडे पैसे नसल्यास त्यांनी नुकसान भरपाईपोटी जो निधी उपलब्ध करून दिला आहे, त्या निधीतून गस्तीनौका उपलब्ध करून घ्यावी आणि जिह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतियांकडून सुरू असलेली मासळीची लूट थांबवावी, अशी मागणी जिह्यातील मच्छीमारांची असल्याचे जोगी यांनी सांगितले.