प्रतिनिधी/ बेळगाव
आश्रय योजनेंतर्गत बहुमजली इमारतींची उभारणी करून गरजूंना घरे देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत 1484 घरांची उभारणी करण्यात येणार असून, योजनेची अंमलबजावणी करण्यास विलंब झाल्याने बांधकामाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे वाढीव रक्कम लाभार्थींनाच भरावी लागणार आहे.
आश्रय योजनेंतर्गत घरे देण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने योजना राबविण्याचे काम रखडले होते. 2005 पासून नागरिकांचे अर्ज प्रलंबित आहेत. 453 नागरिकांनी घरासाठी त्यावेळी 5 हजार भरणा केले होते. पण अद्यापही घर मिळाले नाही. मागील काही वर्षात अर्ज घेऊन नागरिकांकडून 50 हजार रुपये आणि 25 हजार रुपये भरून घेण्यात आले होते. मात्र, महापालिकेकडून त्यांना घरे देण्यात आली नाहीत. त्यामुळे जागेचा शोध घेऊन योजना राबविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. 2016 मध्ये बहुमजली इमारतींची उभारणी करून 1484 घरे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. याअंतर्गत एका घराकरिता 4 लाख 80 हजार रुपये खर्च अपेक्षित होता. पण प्रस्ताव राबविण्यास विलंब झाल्याने बांधकामाचा खर्च वाढला आहे. एका घराकरिता 6 लाख 23 हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे बांधकामाची वाढीव रक्कम लाभार्थींना भरावी लागणार आहे. 2003 मध्ये 5 हजार रुपये भरलेल्या लाभार्थींना व अन्य लाभार्थींना वेगवेगळी रक्कम भरावी लागणार आहे. मागासवर्गीय नागरिकांसाठी शासनाकडून घरासाठी 3 लाख 50 हजार रुपये तर सामान्य वर्गासाठी 2 लाख 70 हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम वजा करून राहिलेली रक्कम लाभार्थींना भरावी लागणार आहे. 1484 पैकी 861 लाभार्थींनी रक्कम भरणा केली नाही.