नागरिकांतून उपस्थित होतोय सवाल, खोकेधारक – नगरप्रशासन धुसफूस सुरूच, हटवलेल्या खोक्यांच्या ठिकाणी पुन्हा डागडुजी
प्रतिनिधी / खेड
सहा दिवसापूर्वी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण हटावची धडक मोहीम हाती घेतली होती. मात्र, हटवण्यात आलेल्या खोकेधारकांसह मनविसेने आक्रमक भूमिका घेत उर्वरित अनधिकृत खोके व वाढीव गाळ्यांवरही कारवाईची मागणी करत नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली होती. दरम्यान, या आक्रमकतेनंतर ही मोहीम काहीशी बारगळल्याचे दिसून येत असले तरी नगरप्रशासन व खोकधारक यांच्यातील धुसफूस अजूनही सुरूच आहे. हटवण्यात आलेल्या खोक्यांच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील डागडुजी सुरू झाली आहे.
नगरप्रशासनाने अचानकपणे अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहीम हाती घेतली होती. नगरपरिषद हद्दीतील सरकारी जागेवर उभारण्यात आलेल्या खोक्यांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली होती. काही खोकेधारकांनी स्वत: हून बांधकामे हटवून नगरप्रशासनास सहकार्यही केले होते. शहरातील समर्थनगर, क्षेत्रपालनगर, बसस्थानक, नाना – नानी पार्क, शिवतररोड, बाजारपेठ व अन्य मागातील तब्बल २४ अनधिकृत खोके हटवत नगरप्रशासनाने दणका दिला होता.
या कारवाईनंतर खोकेधारक आक्रमक झाले होते. गेली १० ते १५ वर्षापासून असणाऱ्या अनधिकृत खोक्यांवर कारवाईचा बडगा का उगारत नाही? असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात येत होता. खोकेधारकांनी माजी आमदार संजय कदम व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची नगराध्यक्षांच्या दालनात भेट घेत व्यथा मांडल्या होत्या. या कारवाईत पक्षपातीपणा केल्याचा आरोप करत खोकेधारकांनी गोंधळही घातला होता. जोपर्यंत उर्वरित अनधिकृत खोक्यांसह वाढीव गाळ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही घेतली होती.
यादरम्यान, अन्य अनधिकृत खोक्यांवर देखील कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, पाच दिवसांचा कालावधी लोटून देखील अद्याप अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत नगरप्रशासनाने कुठलीच कार्यवाही सुरू न केल्याने तर्कवितकांना उधाण आले आहे. ज्या ज्या ठिकाणचे खोके हटवण्यात आले होते त्याठिकाणी पुन्हा खोकेधारकांनी तात्पुरत्या स्वरूपातील उभारणी सुरू केल्याने ही मोहीम बारगळले की काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
*अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा राबवणार*
नगरपरिषद हद्दीत अतिक्रमणाविरोधात राबवण्यात आलेल्या कारवाईत कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा झालेला नाही. ही धडक मोहीम पुन्हा राबवण्यात येणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.