ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना संकटात नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे आपण काहीसे तणावमुक्त झालो आहोत. नागरिकांना दिवाळी आनंदाने साजरी करता यावी, म्हणून मी दिवाळीत कोणतीही आणीबाणी लादणार नाही. फटाक्यांवरही बंदी घालणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
ठाकरे यांनी सोशल मिडियाद्वारे आज जनतेला संबोधित केले. ठाकरे म्हणाले, कोरोना संकटात नागरिकांनी जे सहकार्य केले. ते दिवाळीतही करावे. मी फटाक्यांवर बंदी घालणार नाही. मात्र, नागरिकांनी प्रदूषण करणारे आणि जास्त आवाजाचे फटाके वाजवू नयेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जवळपास सर्व उद्योग सुरळीत सुरू झाले आहेत. दिवाळीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. नागरिकांची गर्दीही वाढत आहे. मात्र, काळजी घेणे आवश्यक आहे.
दिवाळीनंतर नियमावली तयार करून मंदिरे उघडणार
राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे कधी उघडणार यासंदर्भात वारंवार नागरिकांकडून प्रश्न केले जात आहेत. माझ्यावर टीकाही केली जाते. पण कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. दिवाळीनंतर नियमावली तयार करून मंदिरे उघडली जातील.