परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा, राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन
प्रतिनिधी / मुंबई
कोरोना कालावधीसह गेल्या तीन महिन्यांपासून अविरतपणे सेवा बजावणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांच पदरामध्ये अखेर थकित वेतनापैकी दोन महिन्यांचे वेतन पडले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा करत कर्मचाऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. तथापि यासाठी कर्मचाऱ्यांना आक्रोश आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला. तर दोन कर्मचाऱ्यांना आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारला. सरकारच्या या धोरणावर विरोधी पक्षांनी टिकेचा भडीमार केला असून त्यांच्या आत्महत्येप्रकरणी परिवहन मंत्र्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एक महिन्याचे वेतन तत्काळ म्हणजे मंगळवारीच जमा करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर उर्वरित दोनपैकी एक महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी दिले जाणार असल्याचे सांगितले. याशिवाय दुसऱया वेतनासाठी सरकारकडे मागणी केली असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे बिनाव्याज अग्रीम देण्याचाही निर्णय त्यांना जाहीर करावा लागला आहे.
आंदोलनाचे हत्यार आणि आत्महत्येचा परिणाम
दिवाळीचा सण तोंड आल्याने तीन महिन्यांपासून थकित वेतन न मिळाल्याने एसटीचे कर्मचारी हवालदिल झाले होते. वारंवार मागणी करुनही सरकार आणि परिवहन मंत्र्यांचे दुर्लक्ष झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यामुळे किमान काहीतरी मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. तथापि रत्नागिरी आणि जळगाव येथील मनोज चौधरी या वाहकाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याने एसटीला खडबडून जाग आली. आणि परिवहन मंत्र्यांना तत्काळ निर्णय घ्यावे लागले.
सोमवारी दिवसभर विविध आगारात कर्मचाऱ्यांनी निदर्शने सुरुच ठेवली होती. कर्मचाऱ्यांचा वाढता असंतोष आणि वेतनाची चिंता वाढल्याने दोन दिवसांत पगार न दिल्यास एसटी बंदचा इशारा दिला होता.
अग्रीम देण्याचा प्रयत्न
कर्मचाऱ्यांचा वाढता रोष आणि विरोधकांच्या टीकेनंतर अखेर परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनी एसटीच्या सुमारे 97 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थकीत असलेल्या वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन बँक खात्यावर आजपासून जमा होईल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त अग्रीम (बिनव्याजी उचल) हवा असेल त्यांना तातडीने अग्रीम देण्याचा प्रयत्न केला जाईल. उर्वरित दोन महिन्यांच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, बाकी एक महिन्याचे वेतन देण्यासाठी सरकारकडे निधीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना संयमाचे आवाहन
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि प्रवाशांची सुविधा पहावी, असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले असून संपूर्ण महामंडळ त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांना संयमाचे आवाहन करताना त्यांनी कोणाही कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलू नये. सरकार आणि एसटी महामंडळ त्यांच्या सुविधांसाठी कटीबद्ध असल्याचाही त्यांनी विश्वास दिला.
कोरोनामुळे महसूल घटला
ते म्हणाले, टाळेबंदीमुळे अत्यावश्यकसेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे 3 हजार कोटी रुपये महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. तथापि या परंतु या काळातील कर्मचाऱ्यांचे वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.
फक्त सात कोटींचा महसूल
20 सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरू झाली. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याचे टाळत आहेत. याचा विपरीत परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाला. यामुळे टाळेबंदीपूर्वी सुमारे दररोज 65 लाख प्रवासी वाहून नेणाऱया एसटीकडे सध्या केवळ 13 लाख प्रवाशांचा चढउतार होत आहे. यातून दररोज 7 कोटी रुपयांचा महसूल मिळत असून टाळेबंदीपूर्वी दररोज 22 कोटी रुपये महसूल मिळत असे. प्रवासीसंख्या वाढत आहे त्यामुळे लवकरच एसटी पूर्वपदावर येईल, अशी आशा परब यांनी व्यक्त केली.
सरकारच्या मदतीची गरज
तिकीटविक्रीतून मिळणाऱया महसुलाव्यतिरिक्त इतर मार्गाने एसटीचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मालवाहतूक, सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल पंप, खाजगी वाहतूकदारांना बस बॉडीबिल्डिंग करून देणे असे अनेक पर्याय महसूल वाढवण्यासाठी एसटीने निर्माण केले आहेत. परंतु त्यासाठीसुद्धा निधीची आवश्यकता आहे. एसटीची आर्थिक स्थिती भक्कम होईपर्यंत सरकारने मदत करावी, अशी विनंती सरकारला केली आहे, असे परब यांनी स्पष्ट केले.
परब यांना अटक करा : भातखळकर
एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगाराला कंटाळून एसटी महामंडळाचे कर्मचारी मनोज चौधरी यांनी आत्महत्या केली आहे. आपल्या मफत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करणाऱया ठाकरे सरकारने तोच न्याय मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणात लावावा व मनोज चौधरी यांच्या मफत्यूला कारणीभूत मानून परिवहनमंत्री अनिल परब यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.