वार्ताहर / पाचल
महसूलच्या माध्यमातून शासन तिजोरीत वर्षाला लाखो रूपये जमा करणाऱ्या पाचल मंडळ कार्यालय इमारतीची दुरावस्था झाली असून शासनाचे याकडे पुर्णत दुर्लक्ष झालेले आहे. या इमारतीतून कारभार हाकणे तेथील अधिकाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेच. शिवाय या कार्यालयात येणाऱया ग्रामस्थांनाही ही इमारत गैरसोयीची ठरत आहे.
मेक इन इंडिया, डिजिटिल इंडिया अशा मोठ-मोठ्या घोषणाचा डंका शासन सातत्याने करीत असते. मात्र, ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयाची अवस्था किती बिकट आहे. हे पाचल मंडळ कार्यालयाची झालेली दुर्दशा पाहिले की, आपल्या लक्षात येते. त्यामुळे पाचल परिसरातून याबबात तीव्र संताप तथा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
एकूण चार सजा व सुमारे 20 ते 25 गावांसाठी हे महसूल मंडळ कार्यालय कार्यरत आहे. सदर कार्यालयाची इमारत गेल्या अनेक वर्षापुर्वी बांधलेली असल्याने इमारत मोडकळीस आलेली आहे. इमारतीला ठिकठिकाणी तडे गेलेले असून दरवाजे व खिडक्यांची झडपे तुटलेली आहेत. त्यामुळे ही इमारत अंत्यत धोकादायक बनली आहे. सद्यस्थितीत या कार्यालयात कामानिमित्त येणाऱया नागरिकांना तसेच येथील कर्मचाऱयांना आपला जीव मुठीत घेऊनच काम करावे लागते.
येथील मंडळ अधिकाऱयाला बसण्यासाठी स्वतंत्र केबिन नाही. नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था नाही. तसेच स्वच्छतागृहाचीही व्यवस्था नसल्याने नागरिकांची व कर्मचाऱयांचीही मोठी गैरसोय होत आहे. शासनाचे मोठ-मोठे अधिकारी या कार्यालयाला नेहमीच भेट देत असतात. मात्र, त्यांनीही या धोकादायक इमारतीकडे कधी गांभिर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे परिसरातील जनतेमधून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासन तिजोरीत महसूलच्या माध्यमातून वर्षाला लाखो रूपये जमा करणाऱया या इमारतीकडे प्रशासन व राज्यकर्ते आता तरी लक्ष देतील का ? असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे.