प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. गेल्या वर्षभरापासून व्यवसाय नाही, नोकरी नाही. यातच वीज बिलात वाढ करण्यात आल्यामुळे जनतेवर भाजपने भार टाकला असून त्याचा आम्ही निषेध करत आहोत. याचबरोबर वाढवलेली वीज दरवाढ तातडीने मागे घ्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
भाजप सरकारने अचानकपणे प्रतियुनिट 40 पैसे दरवाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला हे वीजबिल भरणे अशक्मय आहे. कोरोनाकाळात अशाप्रकारे महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
सध्या सर्वसामान्य जनता कोरोनामुळे हताश झाली आहे. ग्रामीण भागातही व्यवसाय नसल्यामुळे आणि रोजगार नसल्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. अशा समस्येत ही दरवाढ करणे चुकीचे आहे. तेव्हा तातडीने ही दरवाढ कमी करावी, अशी मागणी करण्यात आली. शिरस्तेदार एम. एम. नदाफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, चिकोडी विभाग अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, बेळगाव नगर काँग्रेस अध्यक्ष राजू सेठ, जयश्री माळगी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.