बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना महामारी काळात १.२० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी शुक्रवारी दिली. बेंगळूर टेक समिट २०२० मध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व देशभरात कोरोनाचे थैमान सुरु असताना आतापर्यंत देशांतर्गत कंपन्या किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमार्फत राज्यात ४०टक्के पेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. ही रक्कम १.२० लाख कोटी रुपये आहे.
कर्नाटक डिजिटल इकॉनॉमी मिशन (केडीएम) द्वारे ही गुंतवणूक केली गेली आहे का, असे विचारले असता त्यांनी, अद्याप ही योजना सुरू झालेली नाही. दरम्यान संचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली असून केडीएम अध्यक्षांची घोषणा होण्याची प्रतीक्षा असल्याचे ते म्हणाले. तसेच केडीएमचे नऊ संचालक असतील, त्यापैकी सहा उद्योगातील आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे उद्योगातील एक व्यावसायिक असेल, असे ते म्हणाले.
केडीएमच्या पुढाकाराने कर्नाटकला पुढील पाच वर्षांत आयटी निर्यातीत १५० अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होणार आहे. कर्नाटकमधील७ हजार स्टार्ट-अप, ई-कॉमर्स आणि अन्य गिग इकॉनॉमी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही कंपनी स्थापन करण्याची कल्पना आहे, असे ते म्हणाले.