प्रतिनिधी/ बेळगाव
सावरकर रोड, टिळकवाडी येथे गेल्या चार महिन्यांपासून पाणी वाया जात असून पाणीपुरवठा मंडळाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहराला सध्या पाणी टंचाई जाणवत असून अशावेळी पाणी वाया जाणे हे परवडणारे नाही. परिसरातील नागरिकांनी याबद्दल पाणीपुरवठा मंडळाला सातत्याने कल्पना दिली. स्मार्टसिटीच्या विभागालाही याबाबत माहिती दिली. आमचे हातातील काम झाले की येतो, असे सांगून दोन्ही विभाग गेल्या चार महिन्यांपासून याकडे दुर्लक्ष करत आहेत.
एकीकडे पाणी टंचाई सुरू झाल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागून प्रचंड प्रमाणात पाणी वाया जात आहे. महानगरपालिका आणि पाणीपुरवठा मंडळ या दोन्ही विभागांनी ही समस्या सोडविण्याऐवजी नागरिकांच्या अडचणीत भर घालण्याचे काम केले आहे. तेव्हा आता नेमके कोणत्या विभागाला किंवा कोणत्या अधिकाऱयाला सांगितल्यानंतर जलवाहिन्यांना लागणारी गळती थांबवली जाईल आणि पाणी वाचवले जाईल, याचा खुलासा संबंधित विभागानेच करावा, असे सावरकर रोड टिळकवाडी येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.