मोर्वे येथे पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून, तीन जणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ खंडाळा
महाड येथे वास्तव्यास असणाऱया अंकुश धायुगडे याच्या 12 वर्षापूर्वी झालेल्या खूनाचा बदला आई, वडील, भावाने घेतला. मोर्वे (ता. खंडाळा) येथे पूर्ववैमनस्यातुन झालेल्या मारहाणीत रविंद्र बांदल (वय 28) या तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. भरवस्तीत सकाळी 10 च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली.
याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोर्वे (ता. खंडाळा) येथे विलास बांदल व त्यांचे कुटुंबिय शेती व्यवसाय करून रहात होते. त्यांचा मुलगा रविंद्र बांदल हा व्यवसायानिमित्त महाड येथे पत्नी व मुलासह रहात होता. चारच दिवसांपूर्वी महाड येथून गावाकडे घराचे बांधकाम चालू असल्याने आला होता. मंगळवार दि. 1 रोजी सकाळी गावातील मंदिरात दर्शनासाठी जातो असे सांगून तो घराबाहेर गेला. दर्शन घेऊन घरी परत येताना रस्त्यात गावातीलच हेमंत धायगुडे याने लोखंडी एल अँगलने पाठीमागून मारहाण केली तर काशिनाथ धायगुडे यांनी कोयत्याने कपाळ व तोंडावर मारहाण केली तर शांताबाई धायगुडे यांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीनंतर जमा झालेल्या लोकांनी रविंद्र यास उपचारासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱयांनी मृत घोषित केले. या मारहाणीत रविंद्र बांदल (वय 28) वर्ष यांचा मृत्यू झाला असल्याने याबाबत हेमंत धायगुडे, काशिनाथ धायगुडे, शांताबाई धायगुडे सर्व रा. मोर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महाड येथे अंकुश काशीनाथ धनावडे हा व्यवसायानिमित्त वास्तव्यास होता. त्यावेळी काही कारणामुळे अंकुशचा 12 वर्षापूर्वी खून झाला होता. यामध्ये संशयित आरोपींमध्ये रविंद्र बांदलचे नाव होते. परंतु त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. परंतु तरीही या दोन्ही कुटुंबामध्ये वैर सुरूच होते. रवींद्र बांदल आणि अंकुशचा भाऊ हेमंत यांच्यामध्ये अनेकदा खटकेही उडत होते. यातूनच मंगळवारी रविंदला कोयत्याने मारहाण झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रविंद्रला लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहले. त्यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले. यावेळी गावात तणाव निर्माण झाला होता. तिघा आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर तणाव निवळला.
याबाबत विलास बांदल यांनी खंडाळा पोलिसांत फिर्याद दिली असून काशिनाथ धायगुडे यांचा मुलगा अंकुश याचा काही वर्षापूर्वी झालेल्या मृत्यूचा राग मनात ठेवून माझा मुलगा रविंद्र याचे वर खुनी हल्ला करून माझ्यावरही हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व खंडाळा पोलिस निरिक्षक संजय पतंगे करीत आहेत.