प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहराच्या दुसऱया विकास आराखड्यात खानविलकर पेट्रोल पंप ते कसबा बावडा येथील श्रीराम सेवा संस्था पेट्रोल पंप दरम्यानच्या 30 मीटर रुंदीच्या (100 फुटी रस्ता) रिंग रोडसाठी आपल्या जमिनी देण्यास संबंधित शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. मात्र या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. आधी नुकसान भरपाई द्या त्यानंतर रस्त्यातून डेनेजच्या लाईन टाका, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रस्त्यांमधून ड्रेनेज पाईपलाईन टाकण्या संदर्भात ड्रेनेज विभागाचे अधिकारी आणि जमीनबाधित शेतकरी यांच्या बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांनी वरील मागणी केली.
शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्याबरोबरच शहरात बाहेरून येणारी वाहतूकही मुख्य मार्गावरून रिंगरोडच्या माध्यमातून बायपास करण्यासाठी खानविलकर पेट्रोल पंप ते श्रीराम सेवा संस्था पेट्रोल पंप दरम्यानचा शंभर फुटी रस्ता होणे आवश्यक आहे. शहर विकास आराखड्यात हा रस्ता प्रस्तावित केला आहे. या रस्त्यासाठी बाधित होणाऱ्या एकुण जमिनीपैकी सुमारे साठ टक्के जमिनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या आहेत, उर्वरित जमिनींपैकी काही प्रस्ताव दाखल झाले आहेत.
पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणारे राजहंस नाला, न्यू पॅलेस नाला व रमणमळा नाला या तिन्ही नाल्या मधील सांडपाणी लाईन बाजार नाला येथे एकत्रित करून ते उपसा करून लाईन बाजार येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर नेण्याची योजना आहे. यामध्ये न्यू पॅलेस पासून पुढे तीस मीटर विकास योजनेतील रस्त्याखाली सांडपाणी घेऊन जाणाऱ्या या पाईप लाईन टाकण्याचे नियोजन आहे. अनेक मिळकतधारकांनी केवळ महानगरपालिकेच्या अट्टाहासामुळे रस्ते विकसित करून दिले आहेत. ही कामे पूर्ण झाल्याबाबत असा दाखलाही विभागीय कार्यालयाने दिला आहे. परंतु टीडीआर स्वरूपातील नुकसान भरपाई अदा करण्यापूर्वीच हे रस्ते खोदकाम करून यामधून सांड पाण्याची पाईपलाईन टाकण्यास परवानगी द्यावी अशी अपेक्षा कोल्हापूर महानगरपालिकेच्या जल अभियंता यांनी व्यक्त केली यास मिळकतधारकांची संमती दिली नाही. रस्ते पूर्ण करून गेली दोन वर्षे झाली, कब्जेपट्टी करा व जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा. नुकसान भरपाई अदा करा आणि पाईपलाईनचे काम करा असा संबंधित मिळकतधारकांचा सूर होता.
महापालिकेकडून लवचिक धोरणाची अपेक्षा
शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर रिंगरोडची आवश्यकता आहे. तो लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. रोड करताना पाणी व डेनेजलाईनसारख्या सेवावाहिन्याही बसवाव्या लागतील. त्यासाठी शेतकरी जमिन देण्यास तयार आहे. मात्र महापालिका भरपाई देण्याच्या दृष्टीने गतीने पावले उचलत नाही. जमिन संपादने संथ गतीने सुरू आहे. त्याचा फटका रोड तयार होण्यावर होणार आहे. हे टाळण्यासाठी महापालिकेने लवचिक धोरण अवलंबण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.