पंढरपूर / संकेत कुलकर्णी
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहून विठोबाच्या पादुकांनी यंदा चक्क एसटी बसने प्रस्थान ठेवले. विशेष म्हणजे आषाढीला सर्व संत पंढरपुरात विठ्ठलाच्या भेटीसाठी एसटीने आले होते. त्यानंतर आता साक्षात विठुराया एसटीने आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलीच्या भेटीला निघाले.
कार्तिक वद्य एकादशी आणि त्यानंतर होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी साक्षात विठोबा उपस्थित होते. असा संत नामदेवरायांच्या अभंगात उल्लेख आहे. त्यामुळे प्रतिवर्षी कार्तिकी पौर्णिमेला विठोबाराय , संत नामदेव आणि संत पुंडलिक यांच्या पादुका ह्या पंढरपूरहून आळंदीला 10 दिवसाचा प्रवास करीत पायी जात असतात. यंदा कोरोनाच्या सावटामुळे पायीवारी रद्द करून कार्तिक पौर्णिमेऐवजी कार्तिक वद्य एकादशीच्या मुख्य सोहळा दिवशी सकाळी संतासह विठोबाराय आळंदीला रवाना झाले