कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या वाहनताफ्यावरील हल्ला प्रकरण चिघळू लागले आहे. राज्यातील ममता बॅनर्जी सरकारमध्ये मंत्री असलेले सुब्रम मुखर्जी यांनी आता भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ल्याचा कट भाजप नेत्यांनीच रचला होता. राज्यात पुढील निवडणुकीत विजय न मिळाल्यास भाजप ममतांच्या हत्येचा कटही रचू शकतो, असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
भांगर शहरातील एका सभेत सुब्रत यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. भाजप राज्यात हिंसाचार फैलावत असल्याबद्दल दुमत नाही. नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ल्याचा कट भाजपनेच रचला होता. निवडणुकीत विजय न मिळाल्यास भाजप काही लोकांना गुप्तपणे राज्यात पाठवून ममता बॅनर्जी यांची हत्या घडवून आणू शकतो, असा दावा सुब्रत यांनी केला आहे. अत्यंत जबाबदारीने भाजपवर आरोप करत असून याची चौकशी केली जावी. आरोप चुकीचे ठरल्यास राजकारणातून संन्यास घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.