वार्ताहर / शिखरशिंगणापूर
सातारा जिल्हातील 756 ग्रामपंचायत निवडणुका दि. 15 जानेवारी रोजी होणार आहेत. तत्पूर्वी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण दि. 14, 15 डिसेंबरला होणार होते, पण यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केल्याने आरक्षण आता निवडणूक झाल्यावर जाहीर होणार आहे. त्यामुळे आता खरी निवडणूकीत गंमत पाहीला मिळणार आहे तर सरपंचपदाची स्वप्न उराशी बाळगणाऱया इच्छुकांची समीकरणे मात्र बदलणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे.
भारतीय घटनेनुसार पंचवार्षिक निवडणुकीतून पंचायतराज निर्मिती होते तर आरक्षण पध्दतीमुळे समाज्यातील सर्व घटकांना विशेतः वंचितांना सरपंचपदाची संधी मिळते. निवडणुकी पूर्वी आरक्षण जाहीर झाले तर आपल्या गळ्यात सरपंच पदाची माळ कशी पडेल..?याची समीकरणे मांडली जातात. ग्रामस्थांचे पुढे सरपंच पदाचा चेहरा उभा करून आपल्या गटाची सत्ता खेचून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो पण निवडणूक आयोगाच्या या बदलामुळे गावगाडा चालविणाऱया पुढारी मंडळींचा पूर्ण नूरच बदलून गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील चुरशीची हवाच गेल्याने काहीशी गंमत निर्माण झाली आहे.
तर मतदारांना देखील सरपंच पदाचा कोणता चेहरा पुढे असणार हे माहीती नसल्याने संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे, तर काहींना मीच सरपंच म्हणून मिरवता येणार नसल्याने गुडघ्याला बाशिंग बाधंणाराचे चेहरे मात्र बघण्यासारखे होताहेत. परंतु यामुळे कदाचित निकोप आणि रास्त निवडणूक प्रक्रिया होईल, अशी ही जाणकार मते व्यक्त करत आहेत.