शेतकरी संघ, झुआरी ऍग्रोचा संयुक्त उपक्रम, चेअरमन जी. डी. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी / कोल्हापूर
जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यासाठी शेतकरी संघ आणि झुआरी ऍग्रोच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी संपर्क मोहीम हाती घेतली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेतकरी संघाचे चेअरमन जी. डी. पाटील, झुआरी ऍग्रोचे रिजनल प्रमुख नागेश पाटील यांनी केले. गुरुवारी शेतकरी संघाच्या मुख्यालयात या मोहिमेचा शुभारंभ झाला याप्रसंगी ते बोलत होते.
जी. डी. पाटील म्हणाले, शेतकरी संघाची भूमिका नेहमी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्यांचे उत्पन्न कसे वाढेल यावर भर दिला आहे. सध्या जमिनीचा पोत बिघडत आहे. जमिनीतील घटकांचे असमतोलपणाचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. तो वेळीच सुधारला नाही तर भविष्यात शेती नापिकीचे प्रमाण वाढणार आहे. ते रोखण्यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेतली पाहिजे.
झुआरीचे रिजनल प्रमुख नागेश पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सध्या शेती आणि रासयनिक खत एक समिकरण बनले आहे. पण याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. शेती अभ्यासक, शेती सहकारी संस्था, अनुभवी शेतकरी, खत उत्पादक कंपन्यां यांनी केलेल्या सूचना. मार्गदर्शनानुसार पाणी, खतांच्या मात्रा दिल्या जात नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकरी संपर्क अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही संपर्क मोहीम जाणार असून तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. ३१ डिसेंबयपर्यंत हे अभियान चालणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी शेतकरी संघाचे मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ, झुआरीचे रिजनल प्रमुख नागेश पाटील, मुख्य व्यवस्थापक सुहास फाळके, सहाय्यक व्यवस्थापक सुजित सानप, मार्केटींग व्यवस्थापक चेतन देशमाने आदी उपस्थित होते.