ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना एक पत्र लिहून आपल्याला संसदीय समितीच्या बैठकीत बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. संसदेत निवडून आलेल्या खासदारांना संसदीय समितीच्या बैठकीत विना अडखळा आपले मत मांडण्याची संधी मिळावी अशी मागणीही त्यांनी यावेळी त्या केली आहे.
बुधवारी संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा न होता केवळ लष्कराच्या गणवेशाच्या रंगावर चर्चा केली जाते असा आरोप करत त्या बैठकीतून राहुल गांधी आणि इतर काँग्रेसचे नेते बाहेर पडले. मुख्य मुद्द्यावर चर्चा न करता अवांतर विषयावर चर्चा करुन वेळ वाया घालवला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
सूत्रांच्या मते, राहुल गांधी यांनी संसदीय समितीच्या बैठकीत लडाखमधील चीनचे आक्रमण आणि भारतीय लष्कराला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करुन द्यावे हे मुद्दे उपस्थित करु द्यावेत अशी मागणी केली. परंतु समितीचे अध्यक्ष असलेले भाजपचे जुएल उरांव यांनी राहुल गांधींना याची परवानगी दिली नाही.