ज्येष्ठ गिर्यारोहक उषाप्रभा पागे यांचा थक्क करणारा प्रवास, रत्नागिरीत साधला गिर्यारोहकांशी संवाद
सह्याद्रीतील सर्व जागा रजिस्टर करणे गरजेचे
जान्हवी पाटील / रत्नागिरी
गिर्यारोहक पती नंदू पागे यांच्यासह त्यांची गिर्यारोहणातील कारकिर्द बहरत असतानाच अचानक काळाने घाला घातला. १९८५ मध्ये नंदू पागे यांना सतोपंथ हिमशिखर मोहिमेत झगडताना मृत्यू आला, पण या कठीण प्रसंगात त्या डगमगल्या नाहीत. हिमालयात त्यांचे पार्थिव सापडत नव्हते. अशावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत पार्थिव शोधून काढण्यासाठी मोहीम आखली आणि तब्बल ४ महिन्यांनी नंदू पागे यांचे पार्थिव शोधून काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ गिर्यारोहक उषाप्रभा पागे यांनी सलग 4 महिने हिमालयात केलेला हा खडतर प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे.
श्रीवल्लभ माधव साठे यांच्या सह्याद्रीतील पदभ्रमणावर आधारित `उमटलेली पाऊले’ या पुस्तक प्रकाशनासाठी उषाप्रभा पागे या रत्नागिरीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी `गिर्यारोहण आणि त्यांची वाटचाल’ या बाबत गिर्यारोहकांशी संवाद साधला. आज ७४ वर्षात पदार्पण केल्यानंतरही त्या गिर्यारोहकांना प्रोत्साहित करण्यासाठी आपली कामगिरी बजावत आहेत. आकाशवाणीच्या केंद्र संचालक म्हणून निवृत्त झालेल्या गिर्यारोहक उषाप्रभा पागे या पुढच्या अनेक पिढ्यांच्या गिर्यारोहकांसाठी दीपगृह ठरल्या आहेत. ज्या काळी मुलींना एखाद्या सुरक्षित सहलीसाठीही घराबाहेर पाठवताना दहावेळा विचार केला जायचा, त्या काळात उषा पागे यांनी सह्याद्रीच्या डोंगररांगा व सुळक्यांवर साहसी गिर्यारोहणाची सुरूवात केली आणि पुढे हिमालयातील खडतर मोहिमांपर्यंत मजल मारली. १९६९ मध्ये शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने त्या पुण्यात आल्या तेव्हा त्यांनी बीओबीपी संस्थेतर्फे गिर्यारोहणाचे धडे घेण्यास सुरूवात केली.
लढाक येथे पोस्टींग मिळावी म्हणून १९८९ साली मी विनंती केली होती. विशेष म्हणजे मला पोस्टींग मिळालीसुध्दा. येथे पोस्टींग घेण्याचे कारण म्हणजे या उंच-उंच पर्वतरांगा पाहता याव्यात एवढाच होता. या उंचीवर काम करणारी मी पहिली महिला ठरल्याचे सांगतानाच व्यक्तीमत्व विकासात गिर्यारोहण महत्वपूर्ण आहे. आज सह्याद्रीतील सडे, डोंगर संरक्षित करण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी कोणत्याही बिल्डरची नजर जावू नये, यासाठी या सर्व जागा शासनाने रजिस्टर केल्या पाहिजेत. हा नैसर्गिक ठेवा आपल्याला मोठ्या प्रमाणावर लाभलेला असून हे जतन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे पागे यांनी सांगितले.
कोकणाला मोठा निसर्ग वारसा लाभला आहे. येथे नद्या समुद्राला येवून मिळतात. हा निसर्ग खजिन्याचे महत्व विशद करणारा आहे. कोकणातच भूभाग विशिष्ट्यपूर्ण तसेच स्थळ, विशिष्ट वनस्पतींचा अभ्यास केला पाहिजे. निसर्ग अनुभव अभ्यासक्रमात यायला पाहिजे. हिमालयातील १४ शिखरांपेक्षा ७ शिखरे काबीज केली आहेत. तसेच गिरीप्रेमीच्या माध्यमातून पुणे विद्यापीठाने गिर्यारोहणाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. असा प्रयोग राज्यात सर्वत्र झाला पाहिजे, मात्र अद्यापही असे झाले नाही, अशी खंत उषा पागे यांनी व्यक्त केली.
जिद्दीमुळे केली अनेक शिखरे सर
जीवनात अनेक संघर्ष आले, मात्र त्यावर मात करण्याची जिद्द व मानसिकता ठेवून आपण अनेक शिखरे सर केली. या प्रवासात अद्यापही खंड पडू दिला नाही. पुढेही पडणार नाही. गिरीप्रेमी या संस्थेच्या माध्यमातून शेकडो ट्रेकर्स निर्माण होत आहेत. हा वारसा हे ट्रेकर्स पुढे नेतील. तरूणांनी निसर्ग सान्निध्यात शोधात्मक अभ्यास करावा. खूप काही शिखण्यासारखे आहे. सडे, डोंगर, निसर्गाचे जतन करणे, आपले प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही उषा पागे यांनी सांगितले.
७४ व्या वर्षीही गिरीभ्रंमतीचा उत्साह कायम
उषा पागे यांनी १९७४ मध्ये लेडिज माऊंटेनियरींग क्लबतर्फे आयोजित पहिल्या महिला मोहिमेत हिमालयातील हनुमान शिखरावर चढाई करतानाच आकाशवाणीच्या केंद्र संचालक म्हणून जवळपास १५ वर्षे त्यांनी विविध केंद्रांवर प्रशंसनीय कामगिरी केली. शिवाय आपल्या अनुभवांविषयी विपूल लेखन त्यांनी केले आहे. निवृत्तीनंतरही आज ७४ व्या वर्षीही त्यांचा गिरीभ्रंमतीचा उत्साह कायम आहे.