प्रतिनिधी / जयसिंगपूर
राज्यातील श्रमिक कामगार वर्ग हा राज्याच्या विकासामधील महत्वाचा घटक असून त्यांचे आरोग्य चांगले असेल, तर राज्याचे आरोग्य चांगले राहील, त्यामुळेच राज्यातील कामगारांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा रुग्णालयांच्या माध्यमातून महानगरांप्रमाणे ग्रामीण कामगारांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळायला हव्यात अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज संबंधित विभागाला दिल्या.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा दवाखाना इचलकरंजी येथे वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांबाबत सर्व श्रमिक संघाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली होती. यावेळी इचलकरंजी येथील महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा दवाखाना स्थलांतरीत न करणे, जयसिंगपूर, शिरोळ येथे नवीन सेवा दवाखाना कार्यान्वित करणे, कन्सल्टींग स्पेशालिस्टची नियुक्ती करून अतिरिक्त रुग्णालयांशी टायअप करणे, पुरेसा औषधसाठा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करणे, विमाधारकांना विनाविलंब सौजन्यपूर्वक व सेवा पुरविणे, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रकरणांचा तत्काळ निपटारा करणे आणि पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि मनुष्यबळ उपलब्ध करणे अशा प्रश्न मांडत यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार याबाबत आपण सकारात्मक असून लवकरच हे सर्व प्रश्न सोडविले जातील असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्पष्ट केले. तसेच संबधित विभागाला यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिले.
आज मंत्रालय मुंबई येथे आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीस महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासो धुळाज, वैद्यकीय उपसंचालक डॉ. संजय ढवळे, वैद्यकीय प्रशासन अधिकारी तथा तक्रार निवारण अधिकारी (पुणे) डॉ. श्रीपाद भागवत, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री जावडेकर, खासदार संजय मंडलिक यांचे प्रतिनिधी विज्ञान मुंडे आणि सर्व श्रमिक संघ, कोल्हापूरचे कॉम्रेड सुरेश पाटील, कॉम्रेड विजय पाटील, कॉम्रेड विजय वरुटे, राजेश वेदांते, कॉम्रेड आनंद कांबळे, आनंद हासुरे आदीजण उपस्थित होते.
राज्यमंत्री यड्रावकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कोल्हापूरसह राज्यभरातील ग्रामीण कामगारांना राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांच्या माध्यमातून महानगरांप्रमाणे अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत.
जिल्हा कृषी अधिक्षक व ॲक्सा विमा कंपनी कार्यालयात केले रात्री ९वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन….३०डिसेंबरला पुणे येथील कृषी आयुक्ताला बेमुदत घेराव घालणार …शंकर गायकवाड
वैराग(प्रतिनिधी)२३डिसेंबर, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तर पिकवीम्यासाठी ॲक्सा विमा कंपनीचे कार्यालयांमध्ये रात्री ९वाजेपर्यंत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यावेळी आकाश उंबरे, दत्तात्र्य पाटील, कृष्णा घावटे, बाळू उंबरे, भोलेनाथ उंबरे, भालचंद्र आगलावे, शरद भालेकर, सचिन आगलावे, समाधान भालेकर, भगवान निर्मळ, नामदेव आगलावे, अर्जून उंबरे, मोहन ननवरे, हनुमंत फोपले, अनुरथ आगलावे, सचिन पाटील, नागनाथ पवार, बाळू पवार, कुमार फोपले, अशोक आगलावे, बाबासाहेब आगलावे, पप्पू शेख, विनोद उंबरे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
चालू वर्षीची अतिवृष्टीची व सर्वच पिकांना शंभर टक्के पिकवीमा भरपाई द्या, सन २०१८-१९चा मागील राहिलेला दुष्काळ निधी द्या, सर्वच खातेदारांना प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ द्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.