नववर्षाच्या स्वागतासाठी खानापूर शहरवासिय सज्ज
वार्ताहर/ खानापूर
2020 या सरत्या वर्षाला निरोप देत खानापूर शहरवासियांनी गुरुवारी ओल्डमॅन जाळून आकाशात दिवे लावून 2021 या नववर्षाचे स्वागत केले. यावेळी सरत्या वर्षाला बाय बाय… म्हणत नववर्षाची सुरुवात चांगली होवो, अशी कामना खानापूर शहरवासियांनी व्यक्त केली.
दोन दिवसांपासूनच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी युवा पिढीबरोबरच बालचमू अगदी उत्साहाने तयारीला लागले होते. घरोघरी जाऊन ओल्डमॅनची देणगी गोळा करण्यापासून ओल्डमॅन बनविण्यापर्यंत तरुणाई दंग होती. 2020 हे वर्ष कोरोना महामारीत गेल्याने फटाके, पार्टी, मद्यपान या सर्वांना फाटा देत आनंदाने सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. यावेळी कोरोना महामारीत बळी गेलेल्या असंख्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावर्षीचा सूर्य सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन उदयाला येवो, अशी कामना शहरवासियांतून करण्यात आली. यावेळी 2020 हे वर्ष सर्वांच्याच लक्षात राहील, असे शब्द काहींच्यातून उमटत होते.
2020 हे वर्ष सर्वांसाठीच वाईट गेले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 2020 ला सुरुवात झाली अन् कोरोनाने अख्ख्या जगभर हाहाकार माजविला. या आजारामुळे हजारो-लाखो लोकांचे बळी गेले, मंदिरांतील देव मंदिरात कैद झाले. कधीही निर्मनुष्य न झालेल्या रस्त्यांवर निरव शांतता पसरली, सर्व नाती-गोती, पै -पाहुणे यांची भेट मुकली, वर्षातून एकदा येणाऱया सर्व सणांना फाटा देण्यात आला, बालचमूंचा मैदानाशी कधीही न तुटलेला संपर्क तुटला, शाळेतील पाटी पुस्तके कोपऱयात धूळ खात बसली, शुभकार्य-मंगलकार्यांना फाटा देण्यात आला, आर्थिक परिस्थिती मंदावली आणि कित्येक रोजगारवर्गाला बेरोजगारीचा सामना करावा लागला. यात काहींनी आपले जीवनही संपविले, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, अशा अनेक वाईट गोष्टी या वर्षात प्रत्येकालाच अनुभवायला मिळाल्या.
डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी अशा अनेक कोरोना योद्धय़ांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनासारखे महायुद्ध लढले आणि अनेकांना या महामारीपासून बचावले. कोरोना महामारीची लस तयार करण्यात वैज्ञानिकांनी रक्ताचे पाणी केले. मोबाईल, टीव्ही, रेडिओ सगळीकडे कोरोनाचेच वारे वाहू लागले होते. इतकेच काय तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी साधा हेल्मेट न घालणारी मंडळीही मास्क आणि सॅनिटायझरचा वापर योग्यरीत्या करत होती. कोरोना महामारी आपल्याला होऊ नये याचीच काळजी जो-तो करत होता. अशा निराशेत आणि दु:खात गेलेल्या 2020 या वर्षाचा निरोप प्रत्येकानेच हसतमुख होऊन घेतला. मात्र या वर्षाने प्रत्येकाच्याच मनात एक प्रकारची हुरहुर, भीती आणि कधीही न विसरणारी छाप टाकली. यामुळे अशा पद्धतीची महामारी पुन्हा कधीही या पृथ्वीतलावर येऊ नये, अशी प्रार्थना खानापूरवासियांनी गुरुवारी पेटविण्यात आलेल्या अग्निला वंदन करून केली.