साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल मार्गी लावण्याच्या हालचाली
प्रतिनिधी/ कराड
कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखेर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी दुपारी त्यांनी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, कराड पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची दीड तास बैठक घेतली. कोल्हापूर नाक्यावरील उपाययोजनांसदर्भात चव्हाण यांनी अधिकारी वर्गाला सूचना दिल्या. येत्या पंधरा दिवसात उपाययोजना कराव्यात, असे सांगितले. उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.
दरम्यान बैठकीनंतर चव्हाण यांनी अधिकाऱयांसमवेत कोल्हापूर नाक्यावरील परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीवेळी त्यांनी लवकरात लवकर उपाययोजनांना सुरूवात करा, असे आदेश दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प व्यवस्थापक व्ही. डी. पंदरकर, कराडचे पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, महामार्ग पोलीस अस्मिता पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, धनंजय येडगे यांची उपस्थिती होती.
बैठकीत चव्हाण यांनी कोल्हापूर ते पुणे मार्गावरील उड्डाणपुलाच्या प्रस्तावाची सध्य स्थितीची माहिती घेतली. उड्डाणपुलाचा प्रस्ताव नेमका कसा आहे, याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक पंदरकर यांनी दिली. यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोल्हापूर नाक्यावर वारंवार अपघात होत आहेत. अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना गरजेच्या आहेत. त्या उपाययोजना करण्यासाठी वेळ घालवू नका. उड्डाणपुलाच्या प्रस्तावासंदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्कात आहे. लवकरच त्यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेणार आहे. हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, कराड पोलीस आणि आरटीओ यांनी आपआपल्या जबादारीने कोल्हापूर नाक्यावर अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकारी यांच्यासह कोल्हापूर नाक्यावर प्रत्यक्ष पाहणी केली. नाक्यावरील कोणता स्पॉट धोकादायक आहे, याची पाहणी करून तिथे वेगमर्यादेच्या नियमासाठी काय करता येईल, याच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी तेथील परिस्थितीची माहिती दिली. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून नियम मोडणारांवर कारवाईच्या सूचनाही देण्यात आल्या.
पृथ्वीराजबाबा कृती समितीशी चर्चा करणार
कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल व्हावा व अपघात रोखले जावेत यासाठी कोल्हापूर नाका उड्डाणपूल कृती समिती पाठपुरावा करत आहे. या कृती समितीशी पुढील आठवडय़ात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चर्चा करणार आहेत. शिवाय कोल्हापूर नाक्यावरील प्रश्नासंदर्भात मी स्वतः दर पंधरा दिवसाला बैठक बोलवणार असल्याचे त्यांनी अधिकारी यांना सांगितले.