आंबा, काजूसह उन्हाळी शेतीला फटका
प्रतिनिधी/ रत्नागिरी
संगमेश्वर, लांजा व दापोली तालुक्यात गुरुवारी दुपारी सलग एक तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले तर रत्नागिरी शहर व तालुक्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. यामुळे आंबा आणि काजू बागायतदारांसह उन्हाळी शेती करणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गुरुवारी दुपारी दापोली, संगमेश्वर व लांजा तालुक्यात गडगडाटासह जोरदार पाऊस तर रत्नागिरीत हलक्या सरी बरसल्या. लांजा तालुक्यात दुपारी 2.15च्या दरम्यान अवकाळी पाऊस पडला. सुमारे 20 मिनिटे पावसाची रिपरिप सुरू होती. दापोलीत सायंकाळी सहानंतर मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळल्या. नोकरदार व कामगार घरी परतण्याच्या वेळेलाच आलेल्या पावसाने लोकांची धावपळ उडाली.
रत्नागिरी शहर व तालुक्यात विविध ठिकाणी सायंकाळी 4 च्या सुमारास रिमझिम पावसाने सुरूवात केली. पावसामुळे शहरात खोदकाम केलेल्या रस्त्यावरील माती सर्वत्र पसरून रस्ते निसरडे झाल्याने वाहनचालक, पादचाऱयांची तारांबळ उडाली. किरकोळ अपघाताचे प्रकारही घडले.
जिह्यात गेले 2 दिवस ढगाळ वातावरण कायम असून थंडी गायब झाली आहे. काही दिवस कायम राहिलेले ढगाळ वातावरण, वाढलेली उष्णता आणि अवेळी पावसामुळे आंबा-काजू पिकांबरोबरच भाजीपाल्यासह अन्य उन्हाळी कडधान्यांच्या पिकावरही विपरित परिणाम झाला आहे.