परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चीनच्या आक्रमक विस्तारवादामुळे भारताशी त्याच्या असणाऱया संबंधांमध्ये अत्याधिक तणाव निर्माण झाला आहे. मात्र, त्याचबरोबर अमेरिकेशी असणाऱया भारताच्या संबंधांचा आलेख मात्र दिवसेंदिवस उंच उंच जात आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी केले.
ते येथे ‘रॉयटर्स नेक्स्ट’ नामक परिषदेत भाषण करीत होते. गेल्या मे महिन्यापासून लडाख सीमेवर भारताचा चीनशी संघर्ष सुरू आहे. गलवान खोऱयात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 सैनिक मारले गेले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये अत्याधिक दुरावा निर्माण झाला. विश्वासाला फार मोठा तडा गेला. चीनविरोधात जनभावना प्रक्षुब्ध झाली आहे. याचा परिणाम परस्पर राजकीय संबंधांवरही होणे स्वाभाविक आहे. मात्र, गलवान संघर्षात भारतानेही चीनच्या असंख्य सैनिकांना यमसदनी धाडले आहे. गेल्या 45 वर्षांमध्ये असा रक्तपात दोन्ही देशांच्या सेनांमध्ये झाला नव्हता, ही वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट केली.
तोडीस तोड सज्जता
गेल्या दहा महिन्यांपासून लडाख सीमेवर चीनच्या सैन्याची मोठी जमवाजमव झाली आहे. ते पुढे येत असल्याचे पाहून आमच्या सेनेच्या तुकडय़ाही पुढे सरसावल्या आणि सीमांचे संरक्षण केले. सध्या सीमेवर अनेक ठिकाणी भारताचे आणि चीनचे सैनिक डोळय़ाला डोळा भिडवून उभे आहेत. चीनच्या तोडीस तोड सैनिक आणि शस्त्रबळ आम्हीही नियुक्त केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेशी संबंध दृढ
दुसऱया बाजूला भारतने अमेरिकेशी संबंध मात्र दृढ केले आहेत. अमेरिकेनेही मनमोकळेपणाने भारताची भागीदारी स्वीकारली आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये भारताने अमेरिकडून 2 हजार कोटी डॉलर्सची शस्त्रे विकत घेतली आहेत. त्यामुळे पूर्वी केवळ रशियावर आपण अवलंबून नाही. अमेरिकेसमवेतच जपान आणि ऑस्ट्रेलियाशीही भारताने जवळीक साधरली आहे. अमेरिकेच्या नव्या प्रशासनाशीही भारताचा उत्कृष्ट संवाद आहे, ही स्थिती त्यांनी विशद केली.