वृत्तसंस्था/ कोलकाता
भाजपच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साथ देण्याचे आवाहन तृणमूल काँग्रेसने डावे पक्ष तसेच काँग्रेसला केले होते. परंतु डावे पक्ष आणि काँग्रेसने हे आवाहन गुरुवारी फेटाळून लावले आहे. भाजपविरोधी लढाईसाठी आघाडी करण्याऐवजी ममतांनी स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, असा खोचक सल्ला देण्यात आला आहे.
डावे पक्ष आणि काँग्रेस खरोखरच भाजपचे विरोधक असल्यास त्यांनी ममता बॅनर्जी यांना बळ पुरवावे. ममता बॅनर्जी याच भाजपविरोधी धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या नेत्या असल्याचे उद्गार तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी काढले आहेत.
ममतांनी काँग्रेसप्रवेश करावा
तृणमूलच्या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी राज्यात भाजप बळकट होण्यासाठी सत्तारुढ पक्षच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तृणमूलसोबत आघाडी करण्यास स्वारस्य नाही. आमच्या आमदारांना खरेदी केल्यावर तृणमूलला आता आघाडी करण्याचे सुचत आहे. भाजपविरोधात लढण्याची इच्छा असल्यास ममतांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. काँग्रेस हे सांप्रदायिकतेच्या विरोधातील लढाईचे एकमात्र व्यासपीठ असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.
आघाडीसाठी उतावीळ का?
ममता बॅनर्जी यांनी 1998 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला होत. डावे पक्ष आणि काँग्रेसला राज्यात नगण्य राजकीय शक्ती ठरविल्यावर तृणमूल काँग्रेस आता आघाडीसाठी उतावीळ का आहे? भाजपही डाव्या पक्षांना आकर्षित करू पाहत असल्याचे विधान माकपचे वरिष्ठ नेते सुजान चक्रवर्ती यांनी केले आहे.
भाजपच एकमात्र पर्याय
आघाडीसाठीची धडपड तृणमूल काँग्रेसची ‘हताश’ मानसिकता दर्शविते. तृणमूल काँग्रेस भाजपसोबत एकटय़ाने लढू शकत नसल्यानेच ते अन्य पक्षांकडून मदत मागत आहेत. यातून भाजप हाच तृणमूल काँग्रेसचा एकमात्र पर्याय असल्याचे सिद्ध होते, असे उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी काढले आहेत.
भाजपचे वाढते आव्हान
लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यावर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांना लोकसभा निवडणुकीत राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती. तर काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले आहेत. तर भाजपने 18 आणि तृणमूलने 22 जागा पटकाविल्या होत्या.