प्रतिनिधी / खानापूर
अयोध्या नगरीत बांधण्यात येणाऱया सुसज्ज श्रीराम मंदिरासाठी 15 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या काळात संपूर्ण देशामध्ये घरोघरी फिरून निधी संकलन करण्यात येणार आहे. खानापूर शहरात देखील राम मंदिरासाठी शनिवार दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 8.30 ते रात्री 8 यावेळेत घरोघरी फिरून निधी संकलन केला जाणार आहे. यासाठी शहराचे 8 विभाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये दत्त वसती, दुर्गानगर, मारुतीनगर, मऱयामा देवी वसती, शिवस्मारक वसती, लक्ष्मीमंदिर वसती, विठोबा वसती, रवळनाथ वसती यांचा समावेश आहे. या आठ विभागांसाठी त्या त्या भागात येणाऱया गल्लीमधील युवक-महिला तसेच नागरिकांच्या कमिटय़ा स्थापन करण्यात आल्या आहेत. त्या सर्व कमिटय़ा आपापल्या भागात निधी संकलनाची सेवा बजावणार आहेत. यासाठी 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपयांचे कुपन तसेच 10 हजारपासून वरील देणग्यांसाठी स्वतंत्र पावती पुस्तके आहेत. या कार्यासाठी खानापूर शहरातून प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त देणगी देऊन अयोध्येत खानापूर शहराचे नाव चमकावे यासाठी हातभार लावावा. तसेच यावेळी प्रत्येक घरासमोर रांगोळी घालून तसेच श्रीरामाचे फोटोचे पुजन करून निधी संकलन फेरीचे स्वागत करावे, अशी विनंती निधी संकलन कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.
अयोध्येत श्रीराम मंदिराची भव्य उभारणी
या निधी संकलनासाठी काढण्यात आलेल्या पावती पुस्तकाचे पुजन समारंभ येथील मेदर गल्लीतील लक्ष्मी मंदिराच्या परिसरात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिरेमन्नोवळी मठाचे परमपूज्य शिवयोगी स्वामीजी उपस्थित होते. यावेळी रमेश गावडे, राजू पाटील, शिवाजी पाटील या दांपत्यांच्या हस्ते पावती पुस्तिकेचे पुजन झाले. यानंतर मेदार केतेश्वर समाज तसेच निधी संकलन समितीच्यावतीने स्वामीजींची पादपुजा करण्यात आली. यानंतर निधी संकलन समितीचे तालुका संयोजक ऍड. सिद्धार्थ कपिलेश्वरी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. खानापूरचे वे.शा.स. शार्दुल जोशी यांनी पावती पुस्तक पुजनाचे पौरोहित्य केले. यावेळी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह बिष्ठाप्पा नाईक म्हणाले, गेल्या पाचशे वर्षापासून अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी समस्त हिंदू समाजाने अनेक प्रकारचे लढे दिले. या लढय़ासाठी 2 लाखाहून अधिक हिंदुंनी बलिदानही दिले. त्यांच्या बलिदानामुळेच आज श्रीराम मंदिराची उभारणी होत आहे. ते पाहण्याचा योग आम्हाला आला आहे. यामुळे आम्ही सर्वजण एकप्रकारे भाग्यवान आहोत. या कार्यासाठी समस्त हिंदू बांधवांनी आपले सारे मतभेद बाजूला ठेवून या कार्यासाठी सढळ हस्ते हातभार लावावा. सदर मंदिराची उंची 160 फूट, लांबी 365 फूट, रुंदी 235 फूट राहणार असून हे मंदिर 3 मजली अशा भव्य स्वरुपात उभारण्यात येंणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी परमपूज्य शिवयोगी स्वामीजींचे आशिर्वचन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पी कट्टीमनी यांनी केले. यावेळी सुभाष देशपांडे, राजू पासलकर, अमर जोरापुरी, राजू गावडे, किरण येळ्ळूरकर, वसंत देसाई, गोविंदराव किरमटे, अमृत पाटील, राजू रायका आदींसह पंडित ओगले, अप्पय्या कोडोळी यासह मेदार गल्लीतील तसेच शहरातील रामभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.