श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱया तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत चार जवानही जखमी झाले आहेत. या चकमकीच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणांनी घुसखोरीचा मोठा डाव उधळून लावला आहे.
एलओसीच्या अखनूर सेक्टरच्या खौर भागात मंगळवारी सायंकाळनंतर दहशतवादी आणि लष्करी जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा मार्ग सुकर होण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने या परिसरात जोरदार गोळीबार सुरू केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कराचे चार जवान जखमी झाले आहेत. यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. याचबरोबर घुसखोरीचा डाव देखील अयशस्वी ठरवला.