पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा
प्रतिनिधी / बेळगाव
स्वातंत्र्य लढय़ात बेळगावचे मोठे योगदान आहे. बेळगाव जिल्हा हा मोठा जिल्हा असून येथे सर्व जाती, धर्माचे लोक परस्पर सामंजस्याने राहतात. पुढील काळातही हीच परंपरा त्यांनी जपावी, हे आवाहन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा पंचायत व इतर सरकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा क्रीडांगणावर आयोजित प्रजासत्ताक कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोविड नियमांचे पालन करून सर्व कार्यक्रम झाले.
रमेश जारकीहोळी यांनी जिल्हय़ातील नागरी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले. जिल्हय़ाच्या विकासासाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अनेक योजना आखल्या आहेत. पूर व अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानभरपाईसाठी 98 हजार 278 शेतकऱयांच्या खात्यावर 74 कोटी 31 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. पूरग्रस्तांसाठी 6 हजार 97 लाभार्थींची माहिती संकलित करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त घरांसाठी जिल्हय़ात 31 कोटी 29 लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी आरोग्य सेवा, आरोग्य केंद्राच्या इमारती उभारणी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रोजगार योजना, झोपडपट्टी विकास, महिला व बाल कल्याण विकास योजना या सर्वांचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त के. त्यागराज, महानगरपालिका, जिल्हापंचायत व जिल्हा प्रशासनातील अधिकारी व अनेक राजकीय नेते उपस्थित होते.