शेतकऱयांना वर्षभरात दुसऱयांदा दणका : मोठय़ा आर्थिक नुकसानीमुळे शेती करणे झाले मुश्कील
वार्ताहर / कडोली
कोबीचे एक पोते 100 ते 120 रुपयेप्रमाणे विकले जात असल्याने कडोली परिसरातील कोबी उत्पादकांना वर्षातच दुसऱयांदा मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
कडोली परिसरात मुख्यत्वेकरून बटाटा आणि कोबी पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पण गेली दोन-तीन वर्षे बटाटा पीक नुकसानीचे ठरत आहे. उत्पादन आणि उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसेनासा झाल्याने बहुतांश शेतकऱयांनी बटाटा पिकाचा नाद सोडून कोबी पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कडोली, जाफरवाडी, देवगिरी भागात मोठय़ा प्रमाणात कोबी पिकाचे उत्पादन सुरू झाले आहे. परंतु कोबी पिकानेही शेतकऱयांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.
शेतकरी हवालदिल
बाजारामध्ये कोबीचे दर एकदम गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 60 ते 70 किलोच्या एका कोबीच्या पोत्याची 100 ते 120 रुपयाला विक्री होत आहे. एका किलोमागे किमान 10 रुपये अपेक्षित असताना केवळ 2 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे कोबी उत्पादनाची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोबीचे एक पोते बाजारामध्ये नेऊन विक्री करण्यासाठी 70 रुपये खर्च येत आहे. भरमसाट उत्पादन खर्च पाहता शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या उन्हाळी हंगामात कोबी उत्पादकांना दरातील घटमुळे पिकांवर नांगर फिरवावा लागला होता. वर्षभरात पुन्हा आता तीच परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने कोबी उत्पादकांत कमालीचे नैराश्य दिसून येत आहे. तेव्हा शासनाने कोबीला किमान दर मिळवून द्यावा किंवा कोबी उत्पादकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱयांतून केली जात आहे.