बलभीम साहित्य संघातर्फे आयोजन, कोरोनामुळे साध्या पद्धतीने दोन सत्रात होणार संमेलन
वार्ताहर/किणये
बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थांच्यावतीने कुद्रेमानी येथे पंधरावे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 31 रोजी आयोजित करण्यात आले आहे. यंदा कोरोना महामारीमुळे संमेलन साध्या पद्धतीने आयोजित केले असून हे संमेलन दोन सत्रामध्ये होणार आहे. गावात संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून कुद्रेमानी हायस्कूलच्या सभागृहामध्ये कै. परशराम गुरव, कुदेमानी साहित्यनगरी संमेलनासाठी सज्ज झाली आहे.
गेल्या चौदा वर्षांपासून पश्चिम भागातील कुद्रेमानी गावात मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्य व संस्कृतीचा जागर करण्यात येत आहे. यंदा मात्र कोरोनामुळे साहित्य संघाच्या कार्यकर्त्यांनी संमेलन साध्या पद्धतीने करण्याचे ठरविले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी. टी. पाटील हे राहणार आहेत.
सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे. विठ्ठल-रखुमाई मूर्तीचे पूजन गावडू आप्पुनी गुरव, पालखी पूजन मल्लाप्पा पाटील, ग्रंथपूजन लक्ष्मण पाटील आदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रंथदिंडीचे उद्घाटन जोतिबा बडसकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गावात ग्रंथदिंडीची मिरवणूक झाल्यानंतर कुदेमानी हायस्कूलच्या सभागृहात संमेलन होणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. आय. पाटील व जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी बेळगावातील मराठी साहित्य संमेलनांसाठी विशेष मदतकार्य करून ग्रामीण भागात साहित्य संस्कृती टिकून रहावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पश्चिम भागात महिला व सर्वसामान्य शेतकऱयांच्या समस्यांसाठी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी नेहमीच आवाज उठविला आहे. यामुळेच संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांना निमंत्रित केले आहे.
सकाळी 10 वाजता पहिल्या सत्राला प्रारंभ होईल. या सत्रामध्ये प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर संमेलनासाठी लाभलेले संमेलनाध्यक्ष डॉ. डी. टी. पाटील यांचे भाषण होईल. पाटील यांचे शिक्षण एम.ए.एम.फिल (मराठी) असे झाले आहे. त्यांनी 2004 साली पीएचडी ही पदवी घेतली आहे. ते भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘चैत’ कादंबरी तसेच ‘मौज’, ‘मुक्त शब्द’, ‘नवअनुष्टुभ’, ‘रसिक’ आदींसह विविध दिवाळी अंक व नियतकालिकांतून कथालेखन केले आहे. सीमाभागातील या संमेलनासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.
दुपारी 12 वाजता दुसऱया सत्राला सुरुवात होणार आहे. या सत्रामध्ये निमंत्रितांचे कवि संमेलन होणार आहे. यामध्ये प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, सुनील पाटील, प्रा. अशोक अलगोंडी, सुधाकर गावडे आदींचा या कवि संमेलनात सहभाग असणार आहे. जीवन भरमू कालकुंद्रीकर यांच्यावतीने साहित्यप्रेमी रसिकांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या संमेलनाची तयारी संघाच्या कार्यकर्त्यांनी केली असून कोरोनामुळे येणाऱया प्रेक्षकांनी मास्कचा वापर करावा. तसेच सामाजिक अंतराचे भान व सॅनिटायझरचा वापरही या संमेलन स्थळी करण्यात येणार आहे. साहित्यप्रेमींनी संमेलनाचा लाभ घ्यावा, असे बलभीम साहित्य संघातर्फे कळविण्यात आले आहे.