आळसंद / वार्ताहर
आळसंद (ता.खानापूर) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 2 कोटी 17 लाख रुपयांची योजना पुर्ण करण्यात आली असून ती योजना 19 फेब्रुवारी 2020 रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेद्वारा शुध्द पाण्याचा गावाला पुरवठा होत आहे. मात्र गावातील काही विरोधक जाणूनबुजून लोकांमध्ये गैरसमज पसरविण्यासाठी ग्रामपंचायतची पाणीपट्टी भरु नका असे लाऊडस्पिकरद्वारे आवाहन करित आहेत. तरी यामुळे कर वसुलीस अडथळा येत असून अशा प्रकारे शासकीय कामात मुद्दामहून अडचण निर्माण करणार्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही दि.1 फेब्रुवारी रोजी आळसंद ग्रामपंचायतसमोर खुल्या हॉलमध्ये धरणे आंदोलन तसेच लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे सरपंच इंदूमती जाधव यांनी सांगली जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच या निवेदनाच्या प्रती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.जंयत पाटील, जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी पं.स.विटा यांना सरपंच, ग्रा.पं.सदस्य आणि आजी माजी पदाधिकार्यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
सरपंच जाधव यांनी निवेदनात म्हटल्याप्रमाणे, आळसंद येथील ग्रामस्थांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता आम्ही शासन दरबारी सन २०१२ -२१३ मध्ये तत्कालीन गृह मंत्री स्वर्गीय आर.आर.पाटील व तत्कालीन ग्रामविकाम मंत्री जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा व प्रयत्न करुन मंजुरी मिळवली होती. यातून आमचे गावात सुमारे 2 कोटी 17 लाख रुपये निधीची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली.
सदर योजना राबवणे हे यापूर्वी गावात मंजूर झालेल्या जलस्वराज योजनेत काही व्यक्तींनी भ्रष्टाचार व नियमबाह्य मनमानी कारभार केल्याचा अनुभव पाहता सदर पेयजल योजना पारदर्शकपणे व उत्कृष्ट व्हावी या हेतूने आम्ही ही योजना शासनाच्यावतीने जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात यावी, अशी लेखी मागणी तत्कालीन ग्रहमंत्री स्व.आर आर आबा पाटील व ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील साहेब यांचेकडे केली होती.
त्यानुसार सदर योजना जिल्हा परिषदेकडून करण्याबाबत शासनाने आदेश दिले होते. त्याप्रमाणे पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सांगली यांनी सदर योजना राबविण्याचे काम हाती घेतले. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सदर योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर ही योजना नियमानुसार सन 2019 मध्ये ग्रामपंचायतच्या ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तेव्हापासून त्या योजनेद्वारे ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.
तरी वरील सर्व बाबींचा विचार होऊन संबंधितांवरती योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा आम्ही दि.1/02/2021 पासून ग्रामपंचायतसमोर खुल्या हॉलमध्ये धरणे आंदोलन तसेच लाक्षणिक उपोषण करण्यात येईल तसेच सदर पाणी पुरवठा योजनेत काही दोष असल्यास पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद व ठेकेदार यांना दोष दूर करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी सरपंच जाधव, ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्य व आजी माजी पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.