बेंगळूर/प्रतिनिधी
आघाडी सरकारमधील वादावरून लक्ष उडवण्यासाठी महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सीमा प्रश्न उकरून काढत आहेत, अशी टीका कर्नाटकच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी केली असून शिवाजी महाराजांचे पूर्वज कन्नड होते, असा अजब दावाही त्यांनी केला आहे. ठाकरे यांनी बेळगाव, कारवार व निपाणी महाराष्ट्रात सामील करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यांनतर कर्नाटकच्या बऱ्याच नेत्यांनी महाराष्ट्र आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.
कर्नाटकातील मराठी भाषिक भाग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच केली होती. त्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी ठाकरेंना त्यांच्या पक्षाचे नाव शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवले असले तरी शिवाजी महाराज कन्नड होते हा इतिहास ठाकरे यांना माहिती नाही. शिवाजी महाराजांचे पूर्वज बेळीयप्पा हे गदग जिल्ह्यातील सोरतूरचे होते. गदग जिल्ह्यात दुष्काळ पडल्यानंतर ते महाराष्ट्रात गेले. शिवाजी महाराज हे त्या घराण्यातील चौथ्या पिढीतील प्रतिनिधी होते,” असा दावा त्यांनी केला आहे.
तर याआधी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी म्हटलं की, ठाकरे यांनी मराठी भाषिक भागांचा प्रश्न त्यांच्या सरकारमधील मतभेदांवरून लक्ष उडवण्यासाठी उकरून काढला आहे. त्यांना करोनाची परिस्थिती हाताळता आली नाही, त्यामुळे त्यांची लोकप्रियता संपुष्टात आली आहे. सावदी यांनी ठाकरे यांच्या विधानावर मुंबई हा कर्नाटकचा भागआहे व केंद्राने त्या निर्णयापर्यंत मुंबई हा केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले, की कर्नाटकची याबाबतची भूमिका कायम आहे.