भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांची टीका : मालवण तालुक्यातील भाजपच्या नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
प्रतिनिधी / आचरा:
काही वर्षांपूर्वी विकासात आघाडीवर असलेल्या जिल्हय़ाला मागे नेण्याचे काम राज्यातील सत्ताधाऱयांनी केले आहे. नारायण राणे सत्तेत असताना जिल्हय़ाचा निधी कमी करण्याची धमक कोणत्याही अधिकाऱयामध्ये नव्हती. मात्र, राणे सत्तेतून गेल्यानंतर अधिकाऱयांवरील धाक संपला. पालकमंत्र्यांसह सत्ताधारी आमदार, खासदार निधी आणण्यात निक्रिय ठरले. ही चीड जनतेत असून यामुळेच तालुक्यातील 6 पैकी 5 ग्रामपंचायतींमध्ये भाजपला यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी दिली.
तालुक्यातील आडवली-मालडी, चिंदर, मसदे चुनवरे, गोळवण-कुमामे-डिकवल, कुणकवळे, खरारे-पेंडूर ग्रामपंचायतींना राणे यांनी भेट देत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, अशोक सावंत, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, बाळू कुबल, उपसभापती राजू परुळेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, संतोष लब्दे, अनिल कांदळकर, सुभाष लाड, दादा नाईक, आशिष हडकर, महेंद्र चव्हाण, विक्रांत नाईक, जगदिश चव्हाण, विजय घाडीगावकर, बाळा घाडीगावकर, भार्गव लाड, जगदिश घाडीगावकर, नीलेश बाईत, संतोष बाईत, मिलिंद घाडीगावकर, नीलेश घाडीगावकर, सुधीर लाड, तुषार हाटले, घनश्याम चव्हाण, योगेश परब, दामिनी घाडीगावकर, ज्योती लाड, संतोष यादव, अमृता चव्हाण, नारायण पांचाळ, अंकुश गोळवणकर, संजय नाईक आदींसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
राणे म्हणाले, राणे यांची आम्हाला शिकवण आहे, निवडणुकीत जिंकणाऱया व्यक्तींचे अभिनंदन करण्याबरोबरच ज्यांचा पराभव झाला, त्यांना कधीही एकटे टाकायचे नसते. त्यामुळे आडवली-मालडी ग्रामपंचायत गेली म्हणून येथील कार्यकर्त्यांना सांभाळण्याबरोबरच गावालाही आम्ही एकटे टाकणार नाही. ज्या गावात भाजपची सत्ता आली, त्या गावांमध्ये ग्रामस्थांच्या विकासाच्या ज्या संकल्पना असतील, त्याची यादी द्यावी. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दिलेला शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. निवडणूक संपली आता राजकारण संपले, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवावे. जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात भाजपने ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. येथील आमदार, खासदार, पालकमंत्री शिवसेनेचा, मग मतदार भाजपला का निवडून देतात? याचा विचार प्रत्येकाने करावा. हे सरकार विकासकामे करण्यात कमी पडल्याने लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. त्यामुळे लोकांनाच हे सरकार पाडायचे आहे. जिल्हय़ात आता भष्टाचार वाढला आहे. जिल्हा पुढे नेण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असेही त्यांनी सांगितले. आडवली-मालडी गावात पराभव झाला असला, तरीही यापुढे आपल्यालाच या गावचा विकास करायचा आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीपूर्वी या गावातील विकास कामे 100 टक्के मार्गी लावण्याचा शब्द त्यांनी दिला. पाच ग्रामपंचायतीत भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळे या गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तेली म्हणाले, 26 जानेवारीला जिल्हय़ात सुमारे 300 उपोषणे झाली हे सत्ताधाऱयांचे अपयश आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. याबाबतची चीड जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत व्यक्त करत सत्ताधाऱयांना त्यांची जागा दाखवून दिली. सत्ताधाऱयांच्या अपयशामुळे भाजपला मोठे यश मिळाले आहे. यापुढेही सर्व निवडणुकांमध्ये भाजपचीच सत्ता असेल. यासाठी सर्वांनी जोमाने कार्यरत राहवे, असे त्यांनी स्पष्ट केले.