प्रतिनिधी / बेळगाव
येथील उषःकाल मंडळाच्यावतीने नुकत्याच कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीवर अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या यल्लाप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. लोकमान्य सोसायटीचे संस्थापक व तरुण भारतचे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी किरण ठाकुर म्हणाले, शहरातील स्मार्ट सिटीबरोबरच ग्रामीण भागातील रस्ते, गटारी काम व स्वच्छतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. कोणताही भेदभाव न करता ग्रामसेवक व अध्यक्षांनी गावचा सर्वांगीण विकास करावा, तसेच एकजुट कायम ठेवून सीमाप्रश्नाची बांधिलकी जपावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब काकतकर म्हणाले, कष्ट व जिद्दीच्या जोरावर पाटील हे ग्राम पंचायतीवर तीनवेळा सदस्य तर एकवेळ अध्यक्ष म्हणून निवडून येऊन जनतेची सेवा केली आहे. पाटील यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांनी केलेल्या कामाची पोचपावतीच आहे. यावेळी शिवाजी हंडे यांनीदेखील पाटील यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नारायण किटवाडकर, शिवाजी हंगीरकर यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी चंद्रकांत गुंडकल, प्रकाश एजरे, काका तेंडोलकर, विनायक कंग्राळकर, अरुण चव्हाण, मिलिंद देशपांडे, शेखर हंडे, रमेश भंडारी आदी उपस्थित होते. सुहास किल्लेकर यांनी आभार मानले.