विदेशमंत्री जयशंकर यांचे विधान
वृत्तसंस्था/ अमरावती
चीनसोबत आतापर्यंत झालेल्या चर्चेचा प्रभाव दिसून आलेला नाही. सैन्याच्या कमांडरने आतापर्यंत चर्चेच्या 9 फेऱयांमध्ये भाग घेतला आहे. काही प्रमाणात पग्रती झाली असली तरीही त्याकडे तोडग्याच्या स्वरुपात पाहिले जाऊ शकत नसल्याचे उद्गार विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी काढले आहेत. भारत आणि चीनदरम्यान मागील वर्षी 5 मेपासून पूर्व लडाखमध्ये सैन्यविषयक तणाव सुरू आहे. तणाव संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्य तसेच मुत्सद्यांदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱया पार पडल्या असल्या तरीही अद्याप तोडगा निघू शकलेला नाही.
सैनिकांना मागे घेण्याच्या प्रक्रियेवरून चर्चेच्या 9 फेऱया झाल्या असून भविष्यातही अशाप्रकारच्या चर्चा होत राहणार आहेत. सैनिकांच्या मागे हटण्याचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. यासंबंधी भौगोलिक स्थिती आणि घटनाक्रम माहित असायला हवा. सैन्य कमांडर यावर काम करत असल्याचे उद्गार त्यांनी काडले आहेत.
कोरोनानंतरचा भारत आता पूर्वीपेक्षा खूपच वेगळा आहे. आज आमच्यासाठी आरोग्य आणि समृद्धी महत्त्वाची ठरली आहे. याचमुळे अर्थसंकल्पात सरकारने आरोग्य आणि विकासाला मोठे प्राधान्य दिले आहे. आगामी दोन वर्षांमध्ये भारत 11 टक्क्यांपेक्षा अधिक विकास प्राप्त करणार असल्याची अपेक्षा असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
चीनकडून शांतता भंग
चिनी सैन्याने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जैसे थे स्थितीत एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न करून क्षेत्रातील शांततेला धक्का पोहोचविला आहे. भारतीय सुरक्षा दलांनी हे प्रयत्न हाणून पाडत असा एकतर्फी प्रयत्न कदापिही स्वीकारला जाणार असल्याची जाणीव चीनला करून देण्यात आल्याचे केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले होते.